गोंदिया : धूम्रपान केल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेल्याचे पुढे आल्यावर केंद्र शासनाने धूम्रपानविरोधी कायदा अंमलात आणला असला तरी या कायद्याचे पालन होतांना कुठेही दिसत नाही. धूम्रपानाच्या विळख्यात आता अल्पवयीन मुलांपासून सर्वच सापडले आहेत. या कायद्यांतर्गत धूम्रपान करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसताना ग्रामीण भागात अल्पवयीन मुलेच पान टपऱ्या चालवत असल्याचे चित्र पाहून या कायद्याचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तंबाखूजन्यविरोधी कायद्यांतर्गत १८ वर्षाखालील मुलांनी तंबाखूमिश्रित पदार्थ विक्री करणे, सेवन करणे कायद्याने गुन्हा व बंदी आहे. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू असल्याने पालक कामात व्यस्त आहेत. त्याचवेळी शाळा, महाविद्यालयांना सुट्या आहेत. अल्पवयीन मुलांना खेळण्यापलीकडे कामे नाहीत. अशावेळी ही बालके दोन पैसे मिळावेत यासाठी पानटपऱ्या चालवताना दिसत आहेत. याचा परिणाम त्यांच्या बालमनावर होत असतानाच सोबत त्यांना व्यसन जडत आहे. ते व्यसनाधीन होत आहेत. धूम्रपानामुळे दरवर्षी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो हे एका सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. धूम्रपान केल्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याची गंभीर दखल घेऊन केंद्र शासनाने धूम्रपान व तंबाखूविरोधी कायदा लागू केला. सुरूवातीला कायद्याची अंमलबजावणी झाली. मात्र नंतर संबधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. आता बालके तंबाखूजन्य पदार्थ खातात यापुढेही जाऊन ही बालके आज थेट त्यांची विक्रीच करताना ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. त्यांच्या पानटपऱ्या सार्वजनिक ठिकाणी आहेत. परंतु कारवाई होत नाही. दोन पैसे येत असल्याने वडीलही त्याला काही बोलत नाही. एकंदर या कायद्याचे धिंडवडे काढले जात आहेत. या कायद्यात दंडाची तरतूद आहे. धूम्रपानविरोधी कायद्यांतर्गत अशा लोकांना केलेले दंड व शिक्षा नगण्यच आहे. बसस्थानक, वर्दळीचे ठिकाण, रेल्वे स्टेशन या भागात धूम्रपान मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्वच शासकीय कार्यालयात खुलेआम धूम्रपान केले जाते. लहान मुलेही सर्रास धूम्रपान करताना दिसत आहेत. पानटपरीचे चालक-बालक असल्याने पुन्हा या ठिकाणी येणाऱ्या चिमुरड्यांचे प्रमाण वाढते. एकंदरीत बालजीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी व्यसन आता फॅशन झाली आहे. तरूण वयात जीवघेण्या व्यसनांना जवळ केल्यामुळे तरूण वयात म्हातारपणाची झलक त्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येते. सद्यस्थितीत ९० टक्के अल्पवयीन तसेच युवा पिढी धूम्रपानाच्या आहारी गेली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. शासकीय प्रयत्नांसोबतच विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांकडून धूम्रपान बंदीसाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तेव्हाच शासकीय कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन धूम्रपानापासून मुक्त होण्यास मदत होईल. मात्र आजघडीला परिसरात अनेक पानटपरीवर बालक तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळतात. असे असतानाही अन्न व औषध विभाग झोपेत आहे. धूम्रपानविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणारे कर्मचारीच कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्यामुळे या कायद्याची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच अल्पवयीन मुले पानटपऱ्या चालवीत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)
अल्पवयीन मुले चालवतात पानटपरी
By admin | Updated: June 14, 2014 23:43 IST