आमगाव : तालुक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून मिळत असलेल्या मदतीचे पैसे घेण्याकरिता येथे नव्याने सुरू झालेल्या कॅनरा बँकेत खाते उघडण्याचे आदेश तहसीलदारांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्यांना अडचणी समोर येत असून तहसीलदारांच्या या आदेशाने अनेकांत रोष व्याप्त आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना जेव्हापासून शासनाने सुरू केली तेव्हापासून अनेकांनी कोकण ग्रामीण बँकेत खाते उघडले. त्या खात्यातून लाभार्थी पैशाची उचल करतात. शासनाचा निधी स्टेट बँक किंवा बँक आॅफ इंडिया येथे जमा होतो. नंतर तो ठराविक निधी कोकण बँकेकडे देवून तेथून वाटप करण्यात येतो. आता मात्र तहसीलदार राजीव शक्करवार यांच्या आदेशाने लाभार्थ्यांना मोठे संकट समोर आले. कारण घाटटेमनी किंवा इतर ठिकाणातून येथील कॅनरा बँकेत येणे म्हणजे २० ते २५ कि.मी. येणे-जाणे करावे लागेल. तालुक्यातील कॅनरा बँक आमगाव येथे सुरू असून इतर ठिकाणी नाही. असे असताना तहसीलदारांंनी कॅनरा बँकेत खाते उघडण्याचे आदेश दिल्याने नवीन व जुन्या लाभार्थ्यांना आता नवीन खाते उघडण्याची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. कॅनरा बँकेचीच तहसीलदारांनी का निवड केली यावर सुद्धा उलट सुलट चर्चा होत आहे. कॅनरा बँकेत खाते उघडण्याच्या आदेशाने अनेकांनी रोष व्यक्त करुन आदेश परत घेण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तहसीलदारांच्या नवीन आदेशामुळे अनेक अडचणी
By admin | Updated: February 5, 2016 01:23 IST