स्वाती श्वेतांबराजी : कलयुगी भक्तांपासून भगवानही सावध राहतात सालेकसा : आजच्या कलयुगातील भक्त हे भस्मासुरासारखे वागत असून देणाऱ्या दात्यालाच संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशा कलयुगी भक्तांपासून भगवानही सावध राहतात. अशा प्रवृत्तीचे भस्मासुरी भक्त स्वत:च एक दिवस भस्म होऊन जातात, असे उद्बोधन साध्वी स्वाती श्वेतांबरा यांनी आपल्या प्रवचनातून केले. तालुक्यातील हलबीटोला येथील त्रिलोकेश्वर धाम परिसरात आयोजित प्रवचनात त्यांनी हे उद्बोधन केले. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित शिव महापुराण कथेवर आधारीत अध्यात्मिक प्रवचन व संगीतमय सत्संग कार्यक्रम त्रिलोकेश्वर धाम येथे आयोजित करण्यात आला. या पाच दिवशीय कार्यक्रमात प्रवचनकार म्हणून वृंदावन (मथुरा) येथील साध्वी स्वाती श्वेतांबरा यांची उपस्थिती लाभली. तिसऱ्या दिवशी शिव महापुराणातील भस्मासुराचा प्रसंग सांगत असताना त्यांनी आजकालच्या कलयुगी भक्तांवर आपल्या वाणीतून जबरदस्त प्रहार केला. त्या म्हणाल्या, आजकाल काही भक्त आपण भक्त असल्याचा खोटा देखावा जास्त करतात आणि देणाऱ्या दात्याला व भगवानालाच विकायला किंवा संपवायला निघतात. अशात भगवान सुद्धा त्यांची स्वार्थी भक्ती ओळखून त्यांना दंड दिल्याशिवाय राहात नाही किंवा त्यांची भक्ती स्वीकार करीत नाही. भस्मासुराची कथा सांगताना त्या म्हणाल्या, भगवान शिवजीनी भस्मासुराला वरदान दिले होते की, ज्या कोणाच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो भस्म होईल. परंतू भस्मासुराने त्या वरदानाचा दुरुपयोग करायला सुरुवात केली. प्रत्यक्ष भगवान शिवशंकरावरच हा प्रयोग करण्यासाठी तो निघाला, परंतु शेवटी शिवशंकराने त्याची नियत ओळखून आपल्या चातुर्याने भस्मासुराला त्याच्या स्वत:च्या डोक्यावर हात ठेवायला लावले आणि भस्मासुराला संपविले. साधवी म्हणाल्या, असे अनेक भस्मासूर आजच्या युगात अधून मधून समाजात निर्माण होतात व चांगल्या लोकांना त्रास देण्याचे काम करतात. भगवान शिवजींना भोले शंकरही म्हटले जाते. कारण ते भोलेनाथ असून कोणालाही केव्हाही इच्छित वरदान देवून टाकत होते. परंतु त्याचबरोबर भगवान शिवजी त्रिशुलधारी सुद्धा होते. अन् वरदानाच्या दुरुपयोग करणाऱ्या दानवाला त्रिशुलाने नष्ट करुन टाकीत होते. त्यामुळे आपल्याला एकीकडे भगवान शंकराची अद्भूत लीला समजून घेणे आवश्यक आहे. तसेच समाजात स्वार्थासाठी ढोंग करणाऱ्या दानवी प्रवृत्तीच्या भक्तांनाही ओळण्याची गरज आहे. त्रिलोकेश्वरधाम मध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी समितीचे अध्यक्ष दुलीचंद क्षीरसागर, उपाध्यक्ष श्यामसुंदर राठी, सचिव दिवाकर भेंडारकर तसेच गणेश वलथरे, सुधीर भेंडारकर, हेमलता नाईक, मिना कुमडे, कैलाश अग्रवाल, सोहन क्षीरसागरण, अशोक अग्रवाल, पवन चुटे, गजानन देवगुणे, पवन कुमडे यांनी विशेष लक्ष दिले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी अरुण कुमडे, गौरीशंकर भेंडारकर, प्रल्हाद वाढई, मुन्ना मेश्राम, अरुण चुटे, मनोज भेंडारकर, गंगा राऊत तसेच सेवादलाचे तोमेश्वर किरसान, महेश भोयर, डालेश्वर, कमलेश्वर, ज्ञानेश्वर, विष्ण, महेंद्र, विरेंद्र, जितेंद्र, प्रविण, दिनेश, अरुण आणि महिला सेवादलाच्या मंदा, झामा, शांता, कांता, सुलका, फुलवंता, पारबता, कमला, गीता, ज्ञानी, मीरा, अनुसया, चंपा, उषा, उमिरला यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला आ. संजय पुराम यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)
अनेकांची वागणूक भस्मासुरासारखी
By admin | Updated: February 27, 2017 00:22 IST