गोंदिया : मागच्या वर्षभरापासून पोलीसांकडून न्याय मागीतला परंतु अद्यापही अन्यायग्रस्ताला न्याय मिळाला नसल्यामुळे अखेर गांधी जयंती दिनी म्हणजेच २ आॅक्टोबर पासून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणावर बसण्याचा निर्णय खमारी येथील अन्यायग्रस्त सुभाष मानकर यांनी घेतला आहे. सुभाष मानकर यांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे आता पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात खमारी (गोंदिया) येथील रहिवासी सुभाष मानकर हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असता संधी साधून काही चोरट्यांनी त्यांच्या घरुन दिवसाढवळ्या सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेची सुचना मानकर यांनी लगेच दुसऱ्या दिवशी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. एवढ्या मोठ्या चोरीची घटना घडूनही पोलिसांनी या घटनेची नोंद तब्बल महिनाभऱ्याने नोंदविली. पोलीस एवढ्यावरच न थांबता तपासादरम्यान मानकर यांच्या घरात पडलेली सोन्याची कानसाखळीही तपासाकरिता सोबत घेवून गेले. मध्यंतरी काही लोकांवर संशय आल्याने मानकर यांनी या संबंधात पोलिसांना कळविले परंतु ग्रामीण पोलिसांनी उलट मानकर यांना दमदाटी करुन हाकलून लावले. न्याय मिळावा व अन्याय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी तसेच पोसिलांनी घरुन नेलेली सोन्याची कानसाखळी व दागिण्यांचे बिल परत मिळावे यासाठी पोलीस अधीक्षकांकडे वर्षभरापूर्वी तक्रार केली. परंतु त्याचाही काहीच फायदा झाला नाही. यावर मानकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मात्र तेथेही अपेक्षाभंग झाला. त्यामुळे आता ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सोनवाने, उपनिरीक्षक देशमुख व हवालदार आडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मानकर हे २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषणावर बसणार आहेत.
मानकर यांचा पवित्रा : गांधी जयंतीपासून उपोषणावर
By admin | Updated: September 28, 2015 02:08 IST