पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : कालव्याला जागोजागी भगदाडरंजित चिंचखेडे चुल्हाडसिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी यंत्रणा असली तरी मुख्य डावा कालव्याची अधोगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे. या कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण उखडले असून जागोजागी भगदाड पडली आहे. सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर शेती ओलीताखाली आणण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. उजवा आणि डावा मुख्य कालवा अशी रचना करण्यात आली असताना विकास मात्र शून्यावर पोहचला आहे. डावा कालवा विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. निकृष्ट बांधकामामुळे जागोजागी सिमेंट अस्तरीकरण उखडले आहे. यामुळे पाणी वाटपात यंत्रणेची कसरत होत आहे. या कालव्याची पाहणी केली असता मुख्य कालव्याला जागोजागी भगदाड पडलेले दिसून आलेले आहे. याशिवाय मुख्य कालवा केरकचऱ्यानी तुंबला आहे. या कालव्यात झुडपी जंगल वाढले आहे. परिणामी खरीप हंगामात कालव्याला कापून पाण्याची विल्हेवाट लावण्याची पाळी शेतकऱ्यावर येत आहे. या मुख्य कालव्याला नहरांना पाणी वळणे करण्यासाठी आऊटलेट चे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु आऊटलेट जीर्ण झाली असून कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक आऊटलेटला लोखंडी दरवाजे नाहीत. असे दरवाजे असल्यास उघडण्याची सोय नाही. लहान नहर व पादचाऱ्यांची अवस्था डोक्याला ताप आणणारी झाली आहे. अनेक नहर आणि पादचाऱ्यांचे खोलीकरण झाले नसल्याने पाण्याचा प्रवाह खंडीत होत आहे. चुल्हाड गाव शिवारात शेतकऱ्यांनी नहरांना पाईप जोडले आहे. यंत्रणेला या पाईप लाईनची माहिती आहे. यामुळे टेलवर असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. परंतु यंत्रणाही टेंशन घेत नाही. विभागात कर्मचारी असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. दरम्यान जुन्या कामाची दुरुस्ती अडली असताना नवीन कामांना देण्यात आलेली मंजूरी खटकणारी आहे. या नवीन कामांचे नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही. यामुळे कंत्राटदारांना रान मोकळे करण्यात आल्याने निकृष्ट बांधकाम होत आहे. पहिल्याच पाणी वाटपात असे विकास कामे वाहून जात आहेत.याशिवाय डावा कालवा विकासात मुरुमाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. पिपरी चुन्ही ते चुल्हाड गावापर्यंत पायदळ प्रवास ही मुश्कील झाले आहे. यामुळे नागरिकांना सिहोरा गाढावे लागत आहे. या नादुरुस्त कामाचे अद्याप नियोजन करण्यात आले नाही. या विभागाअंतर्गत रनेरा गावात विश्रामगृह, चांदपुरात विश्रामगृह तथा चुल्हाड व सिहोऱ्यात कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. परंतु या विश्रामगृह व वसाहतीची दूरवस्था होत आहे. तुमसर तालुक्यात सिहोरा पाटबंधारे विभागाची व्याप्ती मोठी आहे. शाखा अभियंत्याची ५ पदे असताना एकट्या सिहोरा विभागासाठी २ पदे आहेत. परंतु हे पदे सुद्धा रिक्त आहेत. शाखा कारकून या विभागात नाहीत. सेवानिवृत्त होवून गेले असता पुन्हा नवीन परतलेच नाही. यामुळे कालवे व नहराचा विकास प्रभावित झाला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रभारी शाखा अभियंता देशकर व हटवार यांना संपर्क साधले असता होवू शकला नाही.
डावा कालवा उखडला
By admin | Updated: January 28, 2016 01:47 IST