अर्जुनी-मोरगाव : दोन तालुक्यामिळून मंजूर झालेले येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय अखेर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू झाले. कामकाज सुरू करण्यासाठी प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार डी.सी.बोंबर्डे यांच्याकडे प्रभार दिला असला तरी येथे पुरेसे मनुष्यबळ मिळाले नसल्यामुळे कामकाजाला गती मिळालेली नाही.अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी हे दोन तालुका मिळून एका उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली होती. नव्याने निर्माण होणाऱ्या उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय दोन्ही तालुक्याचा भौगोलिक विचार करता अर्जुनी-मोरगाव येथे देण्यास मंजुरी मिळाली. नाराज झालेल्या सडक-अर्जुनीवासीयांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयीन प्रक्रियेत अशीच तीन-चार वर्षे निघून गेलीत. अखेर दोन तालुके मिळून नव्याने निर्माण होणाऱ्या उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी-मोरगाव येथे राहणार असे राज्य सरकारने ठरवले. शासनाचे उपसचिव की.पा. वडते यांच्या ५ जानेवारीच्या पत्रान्वये उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी-मोरगाव येथे निश्चित झाले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी १९ जानेवारीला अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालय सुरू केले. स्थानिक तहसील कार्यालयातील सेतु केंद्रात उपविभागीय कार्यालय असा नामफलक लावण्यात आला आहे. तहसीलदार डी.सी. बोंबर्डे यांनी २१ जानेवारीपासून प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून कामकाजाला सुरूवात झाली. उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी-मोरगावला सुरू झाले. मंजुर झालेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्यामुळे मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. जागेचाही प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी कार्यालय केवळ नामधारी न राहता या ठिकाणी पूर्णवेळ अधिकाऱ्यासह पुरेसा कर्मचारी वर्ग मंजूर करावा, अशी अपेक्षा तालुकावासीयांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
एसडीओ कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव
By admin | Updated: February 7, 2016 02:36 IST