देवानंद शहारे - गोंदिया
कृषी विभागाने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जमिनीच्या क्षेत्रनिहाय विविध पिकांच्या लागवडीसाठी नियोजन केले आहे. यात भातपिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर असून इतर पिकांचे मिळून यंदाचे नियोजित लागवड क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर राहणार आहे. कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील विविध पिकांसाठी सरासरी क्षेत्र व नियोजित क्षेत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकर्यांना अनुदानाच्या विविध योजना १६ मे नंतर कृषी विभागाला उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर पिकासाठी सरासरी क्षेत्र ५३१० हेक्टर असून ७४०० हेक्टर क्षेत्र त्यासाठी नियोजित करण्यात आले आहे. मूंग पिकाचे सरासरी क्षेत्र ६० हेक्टर असून यंदाचे नियोजित क्षेत्र १०० हेक्टर आहे. उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र १७० हेक्टर असून यंदाचे नियोजित क्षेत्र १०० हेक्टर आहे. तीळ पिकाचे सरासरी क्षेत्र ११४० असून यंदाचे नियोजित क्षेत्र १२०० हेक्टर आहे. भाजीपाला व इतर पिकांसाठी सरासरी क्षेत्र शून्य आहे तर यंदा १२०० हेक्टर जमिनीत भाजीपाला व इतर पिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. ऊसासाठी जिल्ह्यात ३५० हेक्टर क्षेत्र सरासरी असून यंदाचे नियोजित क्षेत्र १२०० हेक्टर आहे. बियाण्यांचेही नियोजनही करण्यात आले असून त्यासंबंधीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यात गोंदिया तालुक्यासाठी महाबीज ३६५६ क्विंटल व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५४०६ क्विंटल बियाणे, तिरोडा तालुक्यासाठी महाबीज ३५६६ क्विंटल व खासगी १७०० क्विंटल असे एकूण ५२५६ क्विंटल, आमगाव तालुक्यासाठी महाबीज ३५४५ क्विंटल व खासगी १६५० क्विंटल असे एकूण ५१९५ क्विंटल बियाणे, गोरेगाव तालुक्यासाठी महाबीज ३०४६ क्विंटल व खासगी १६०० क्विंटल असे एकूण ४६४३ क्विंटल बियाणे, सडक/अर्जुनी तालुक्यासाठी महाबीज ३५५७ क्विंटल महाबीज व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५३०७ क्विंटल बियाणे लागणार आहेत. अर्जुनी/मोरगाव तालुक्यासाठी महाबीज ३५४७ क्विंटल व खासगी १७५० क्विंटल असे एकूण ५२९७ क्विंटल बियाणे, सालेकसा तालुक्यासाठी महाबीज ३३५६ क्विंटल व खासगी १५०० क्विंटल असे एकूण ४८९५ क्विंटल बियाणे व देवरी तालुक्यासाठी महाबीज ३३५६ क्विंटल व खासगी १६३५ क्विंटल असे एकूण ४९९१ क्विंटल बियाण्यांची मागणी तालुकानिहाय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांसाठी महाबीज २७६६५ क्विंटल व खासगी १३३३५ क्विंटल असे एकूण ४१ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.