सालेकसा : सालेकसा-आमगाव मार्गावर सालेकसापासून दोन कि.मी. अंतरावर रोंढा या गावाजवळ रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या महिलेला काळी-पिवळीने धडक दिल्यामुळे तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दि.३० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे काळी-पिवळी यमदुत बनून आल्याचे पुन्हा सिद्ध झाले.सालेकसा तालुक्यातील सर्व गावे हागणदारीे मुक्त झाले तरी काही गावे फक्त कागदावरच हागणदारीमुक्त असून अनेकांच्या घरी शौचालयाची सोय नाही. रोंढा या गावातसुद्धा अनेकांच्या घरी शौचालये नसल्यामुळे घरातील लोक बाहेर जातात. विशेष करुन महिलांना सायंकाळी अंधार पडल्यावर शौचासाठी जाण्याची सवय असते. या सवयीला अनुसरुन रोंढा या गावातील महिला कलावती भुरकलाल शंभरवार (४८) ही सायंकाळी ७.३० वाजता गावाबाहेर सालेकसा-आमगाव मुख्य मार्गावर शौचास गेली. एवढ्यात सालेकसाकडून आमगावकडे जात असलेली काळी-पिवळी (एम.एच.३१/ए.पी.८७०२) सुसाट वेगाने जात असताना वळणावर शौचास बसलेल्या महिलेला धडक दिली. या धडकेत कलावतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या मार्गावर काळी-पिवळीमुळे अनेक अपघात घडून सुद्धा काळी-पिवळी चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवितात. या मार्गावर गावानजीक कुठेही गतीरोधक नसल्याने वाहनांची गती नियंत्रणाबाहेर असते. याचाच परिणामामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. बातमी लिहीपर्यंत चालक पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता. या घटनेमुळे गावातील लोक खूपच संतापले. (तालुका प्रतिनिधी)
काळी-पिवळीच्या धडकेत महिला ठार
By admin | Updated: November 1, 2015 02:12 IST