रहांगडालेंचे योगदान : सतत १० वर्षांपासून राबविले अनेक कार्यक्रमआमगाव : संयुक्त वन व्यवस्थापन समिती वळदच्या अध्यक्ष पदावर सरपंच किशोर रहांगडाले कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कालखंडात विविध कार्यक्रम घेऊन जनतेला व वनविभागाला जागृकतेचा संदेश दिला आहे. या कार्यात समस्त वळद ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य सतत मिळत असल्याचे अध्यक्ष किशोर रहांगडाले यांनी मत व्यक्त केले आहे. वनविभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यात आवळा, जांभूळ, सीताफळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात बांबू सात ते आठ फूटपर्यंत उंच झाले. फळबाग तीन ते साडेतीन फूट उंच असून त्यांची वाढ होतच आहे. या संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून या लागवड क्षेत्रात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी यावर कठोर नियंत्रण आहे. १० वर्षात या लागवड क्षेत्रात वणवा लागला नाही. समितीकडून उन्हाळ्यात विशेष लक्ष दिले जाते. मोहफुलांच्या झाडांची जोपासना व काळजी घेतली जाते. मोहफुलांपासून व इतर वनौपजमधून गावकऱ्यांना पैसे मिळतात. यावेळी झालेल्या आमसभेत गावाला ग्रामभवन घोषित करण्याचा ठराव एकमुखी घेण्यात आला. त्यात गावाला वानविभागाकडून सोलर दिवे, सोलर कुकर, सोलर चुली या साधनांचा पुरवठा करण्यात यावा. जेणेकरून जंगलतोडीला आळा बसेल. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यास मदत मिळेल. जंगलात वनतळे, सिमेंट बंधारे तयार करावे. त्यामुळे प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल. प्राणी इतरत्र भटकणार नाही. पाण्याचा साठा तयार होईल, अशी मागणी अध्यक्ष किशोर रहांगडाले यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठरली उपक्रमशील
By admin | Updated: February 4, 2016 02:02 IST