बोंडगावदेवी : चापटी गावातील दोन प्रेमीयुगुलांच्या वैवाहिक कार्याला जन्मदात्या आई-वडिलांचा होणारा विरोध लक्षात घेता चापटी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने ‘त्या’ प्रेमवीरांना लग्नाच्या बेडीत बांधून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्याचे कार्य केले. चापटी येथील दोन्ही प्रेमीयुगूल सज्ञान असून त्यांनी आपल्या प्रेमावर विजय मिळविल्याचे स्पष्ट केले. अरविंद श्रीकृष्ण जुमनाके असे प्रेमवीराचे तर वैशाली कुंभरे असे प्रेयसीचे नाव आहे. दोघेही एकाच गावातील असून सजातीय आहेत. मागील काही वर्षांपासून दोघांचे प्रेम बहरले होते. दोघांचे वास्तव्य गावातच असल्याने भविष्यात आपण एकमेकांपासून अलिप्त राहणार नाही, अशी खूणगाढ त्या दोघांनी मनाशी पक्की करून घेतली. येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्यांच्या भेटीगाठीचे नित्यक्रम झाल्याने पुढील आयुष्यात आपण समाजात पती-पत्नी म्हणून वावरू, असे ते स्वप्न रंगवू लागले. या प्रेमीयुगुलांची माहिती आई-वडिलांना झाल्याने त्यांनी त्यांच्या प्रेमविवाहास नकार दिला. त्या दोघांनी घरच्यांचा विरोध पत्करला, परंतु एकमेकांपासून अलग राहणार नाही, अशी प्रतीज्ञा केल्याने अखेर आई-वडिलांचे प्रयत्न निष्फळ ठरले. लोकांच्या नजरेआड असे किती दिवस काढायचे, याचा सारासार विचार करून अखेर त्या प्रेमीयुगुलाने गावातील तंटामुक्त समितीकडे आपली कैफीयत मांडून लग्न लावून देण्याची विनंती केली. गावच्या प्रेमीयुगुलांचा आलेला अर्ज पाहून तंमुसने प्रेमीयुगुलांच्या आई-वडिलांना सभेत बोलावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची खात्री झाल्याने हिंदू विवाह पध्दतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला. गेल्या काही वर्षापासून प्रेमात पडलेल्या त्या प्रेमीयुगुलांना गावातील नागरिकांच्या उपस्थितीत तथा आशीर्वादाने विवाह बंधनात अडकवून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्यात आले. विवाहाप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंता परसमोडे, निमंत्रक तथा पोलीस पाटील टिकाराम बन्सोड, सरपंच जागेश्वर कोरे, माजी जि.प. सदस्य मधुकर मरस्कोल्हे तसेच गावातील महिला-पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते. तंटामुक्त समितीच्या वतीने नवदाम्पत्यांना संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. (वार्ताहर)
तंमुसच्या पुढाकाराने प्रेमीयुगूल विवाहबंधनात
By admin | Updated: February 9, 2016 01:34 IST