किडींचा प्रादुर्भाव : तूर, चना, लाखोळीला नुकसानगोंदिया : गेल्या १५ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. आधीच यावर्षी खरीप पिकांनी दगा दिला असताना रबीतून मिळणारे थोडे उत्पन्नही हातचे जाणार की काय, या भितीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. सध्या शेतात तूर, चना, लाखोळीचे पिक तोंडाशी आले आहे. मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे त्यात कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडे औषधी फवारणी करावे लागत आहे. कृषि विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७१३४ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली आहे. चना ५८६९ हेक्टरमध्ये, जवस ५९६७ हेक्टरमध्ये लागवड झाली. याशिवाय १२५५ हेक्टरमध्ये गव्हाची लागवड आहे. रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यानंतर तरी ढगाळ वातावरण निघून जाईल अशी आशा होती. पण अद्याप ढगाळ वातावरण कायम आहे. विशेष म्हणजे यावर्षी माकडांच्या टोळीकडूनही तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ढगाळ वातावरणाने वाढली चिंता
By admin | Updated: December 25, 2015 02:29 IST