गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील काेकणा येथे नंदलाल चांदेवार यांची अडीच हेक्टर शेती आहे. त्यांनी यंदा रब्बी पिकाची लागवड केली असून यासाठी नवेगावबांध जलाशयाचे पाणी देण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली. पण, याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पाणी सोडण्याची मागणी शेतकरी चांदेवार यांनी केली आहे.
निवेदनातून आपण नियमित शेतसारा आणि पाणी पट्टी भरत आहोत; तसेच जलाशयाचे पाणी रब्बीसाठी देण्याची तरतूदसुद्धा आहे. पण, संबंधित विभाग पाणी देण्यासाठी टाळटाळ करीत आहे. त्यामुळे त्यांचे अडीच हेक्टरमधील पीक धोक्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पाणी सोडण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी चांदेवार यांनी केली आहे.