खोब्रागडे यांना निरोप : पोलिसांचा चोख बंदोबस्त गोंदिया : जिवन- मृत्यूच्या लढय़ात अखेर मृत्यूचा विजय झाला व २३ मे रोजी संजय खोब्रागडे यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) ग्राम कवलेवाडा येथे सायंकाळी ५ वाजता दरम्यान शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. १६ मे रोजी मध्यरात्री संजय खोब्रागडे यांना झोपेतच जाळण्यात आल्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. तेव्हापासून सुरू असलेली खोब्रागडे यांची मृत्यूशी झुंज अखेर २३ मे रोजी संपली. शनिवारी (दि.२४) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने दुपारी ३ वाजता गंगाझरी पोलिसांनी मृत संजयच्या पत्नी देवकाबाई यांना त्यांच्या गावी आणले होते. तर दुपारी ३.३0 वाजता दरम्यान संजयचा मृतदेह गावात दाखल झाला. संजयचा मृतदेह प्रथम त्यांच्या घरी ठेवण्यात आला व काही वेळाने ज्या जागेसाठी हा वाद सुरू आहे त्याठिकाणी नेण्यात आला. पश्चात तेथूनच अंत्ययात्रेला सुरूवात झाली. गावातील मोक्षधाम येथे सायंकाळी ५ वाजता दरम्यान संजय खोब्रागडे यांच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला. अतिशय शांतीपूर्ण वातावरणात हा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला. अंत्यसंस्काराला गावासह गोंदियातूनही मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली. यात शुद्धोधन शहारे, विनोद नांदूरकर, अशोक बोरकर, यशपाल डोंगरे, सतीश बंसोड, राहू राहुलकर, रतन वासनिकसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे याप्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)
शांततेत पार पडला अंत्यसंस्कार
By admin | Updated: May 24, 2014 23:41 IST