डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धान पिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय. पण, आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
प्रवासी निवाऱ्यांची मागणी
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते. पण, जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीसी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडेगावांचा समावेश येत असतो. या गावी दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते.
बनगाव येथे घाणीचे साम्राज्य
आमगाव : बनगाव येथील वाॅर्डमधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.
अनुदानाचे वाटप करण्याची मागणी
गोरेगाव : गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनुदान जमा करण्याची मागणी होत आहे.
लाभापासून कर्मचारी वंचित
सडक-अर्जुनी : शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून वर्षभराचा कालावधी झाला; परंतु वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अद्याप लाभ देण्यात आला नाही.
हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त
गोंदिया : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे अवागमन होत असून, त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. अशांवर कारवाईची गरज आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतूक ठप्प
गोरेगाव : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आमगाव महामार्गाचे बांधकाम रखडले
आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग क्र. ५४३ व ३६३ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यांलगत नाल्यांचे अपूर्ण बांधकाम पावसाळ्यात लोकवस्तीकरिता धोक्याची घंटा ठरत आहे. हे काम करणाऱ्या कंपनीने या बांधकामाचे बारा वाजवून ठेवले आहेत. संपूर्ण बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, लक्ष ठेवण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
आमगाव : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. जवळपास दोन कि.मी. पर्यंतच्या महामार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. दरम्यान या मार्गावरुन भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.