कालीमाटी : जि.प. घाटटेमनी परिसरातील विविध समस्यांविषयी स्थायी समितीच्या सभेत ठराव मंजूर करुन समस्येचे निराकरण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांनी दिला आहे.आमगाव तालुक्यातील घाटटेमनी तसेच अनेक गावांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. नागरिकांना व शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सत्ताधारी पक्ष व शासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरणार असल्याचे हर्षे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना उन्हाळी पीक घेता यावे जेणेकरुन खरीप पिकांची नासाडी व गहाण असलेल्या शेतकऱ्यांना कसेबसे मिठभाकरीची व्यवस्था करता येईल. त्याकरिता पुजारीटोला धरणातील बाघ सिंचन व्यवस्थापन कालीमाटी शाखेंतर्गत मेहगाव, कातुर्ली, करंजी, टेमनी वितरीका कालीमाटी, टाकरी, भोसा, मानेकसा वितरीका नगंपुरा, रामजीटोला, बंजारीटोला, कालीमाटी-मानेकसा आणि आमगाव उपविभाग अंतर्गत धामनगाव, कट्टीपार, सरकारटोला, मुंडीपार, रामजीटोला कालव्यांची रोटेशननुसार सदर हंगामासाठी पाणी हवे आहे. पण या कालव्यांना वंचित केले जात आहे. पुजारीटोला धरणाच्या कालव्यातून धान पीक घेणाऱ्या वितरीकेतून सालेकसा तालुक्यात २३८ हेक्टर आर, आमगाव तालुका ३५७ हे आर. गोंदिया तालुका ५९५ हेक्टर आर शेतीला पाणी पुरवठा करण्याचे आदेश असताना सुद्धा जि.प. घाटटेमनी व सितेपार क्षेत्राचा समावेश नाही. तसेच इंदिरा आवास योजनेतील कायम प्रतिक्षा यादीमध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांचे दारिद्र्यरेषेखाली नाव असून त्यांना घरकुलांची गरज आहे. तसेच ज्यांचे कच्चे मातीचे घर आहेत अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळावा याकरिता शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभेची मंजुरी घेऊन नाव समाविष्ट करता येते. याकरिता ग्रामीण विकास यंत्रणेकडून खंडविकास अधिकारी व इतर संबंधित यंत्रनांना पत्र देण्यात आल्यामुळे गरीब गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळणार असल्याचे दि.२१ डिसेंबरच्या स्थायी समितीच्या सभेत हर्षे यांनी चर्चा घडवून आणली. त्यामुळे जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी मान्यता दिली.जिल्ह्यात शाळेत शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यासंबंधी दखल घेऊन पोषण आहारातील मूगदाळ, मिर्ची पावडर इत्यादी वस्तू दर्जेदार व उत्कृष्ठ प्रतीच्या देण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. जलयुक्त शिवार ही योजना राज्यामध्ये कृषी विभागमार्फत जि.प. लघु पाटबंधारे विभाग राबीत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात कृषी विभाग राबवितो. ही योजना शेतकऱ्यांच्या शेती उपयुक्त असल्यामुळे जिल्हा परिषदेला राबविण्याबाबत ठराव सुरेश हर्षे व सहकाऱ्यांकडून पाठविलेला आहे. (वार्ताहर)
स्थायी समितीच्या सभेतील समस्या मार्गी लावा - हर्षे
By admin | Updated: December 26, 2015 02:02 IST