अर्जुनी मोरगाव : खादी ग्रामोद्योग नागपूर, जायस्वाल महाविद्यालय येथील प्राणीशास्त्र विभाग व विज्ञान महाविद्यालय पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय मधमाशी पालन कार्यशाळा पार पडली. या विषयातील तज्ज्ञ प्रा.डॉ. बी.एस. रहिले, पवनी यांनी उपस्थित शेतकरी व विद्यार्थ्यांना मधमाशीबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. डॉ. रहिले यांच्या मते शेतकऱ्यांच्या उत्पादनात मधमाशी पालनाने मोठी क्रांती होणे शक्य आहे. धान व गहू ही दोन पीके वगळून सर्वच पिकाच्या उत्पादनात मधमाशी पालनाने दुप्पट वाढ शक्य आहे. शेतामध्ये मधमाशी पालन केल्यास परागकणाची क्रिया वाढीस लागल्याचे काम मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे कडधान्य, फळ, फुले, भाज्या या प्रकारातील पिकांचे उत्पादन वाढीस मदत होते. तसेच मधमाशी पालनाने मध, मेन आणि शेतीच्या उत्पादकतेत वाढीसारखे फायदे शेतकऱ्यांना होतील. शेतकऱ्यांनी स्वत:ची उन्नती व शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशी पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विरली बु. येथील प्रगतीशिल शेतकरी अखिल कोरे यांनी मधमाशी पालनातून झालेल्या लाभाची माहिती व अनुभव उपस्थितांना सांगितले. लुनकरण चितलांगे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत अतिथी म्हणून बद्रीप्रसाद जायस्वाल, मुकेश जायस्वाल, यशवंत लंजे, डॉ. पाठणकर, शिवणारायण पालीवाल, डॉ. गोपाल पालीवाल, प्रा. पुरुषोत्तम गेडाम, डॉ. कैलास गाडेकर, डॉ. विजय लेप्से, नामदेव कापगते, डॉ. श्रीकांत नाकाडे, प्रा. अजय राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेश चांडक यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. शेखर राखडे, डॉ. शरद मेश्राम, सुनिता तवाळे, संतोष बागडे, रोशन ब्राम्हणकर, गजानन कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
पाच दिवसीय मधमाशी पालन कार्यशाळा
By admin | Updated: March 13, 2017 00:24 IST