अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी समूह शेती लाभदायक आहे. शासनाच्या या योजनेत भरीव सबसिडी आहे. वैयक्तिक शेती करून मर्यादित राहण्यापेक्षा या माध्यमातून मोठ्या उद्योगधंद्यांकडे वळावे. आपण यासाठी समूह गटांना सर्वतोपरी सहकार्य करू. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यात क्लस्टरचे पाच प्रकल्प राबवायचे आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून समूह शेतीची माहिती घेऊन त्याकडे वळावे व आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
कृषी विभागातर्फे मंगळवारी स्थानिक उमेद भवनात आयोजित कृषीविषयक विविध योजनांबाबत शेतकऱ्यांशी सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रगतशील शेतकरी रतीराम राणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार उपस्थित होते. चंद्रिकापुरे म्हणाले, आदिवासी समाज मोहवृक्षाला देव मानतात. ते त्यांच्यासाठी कल्पवृक्षच आहेत. मोहफूल आता मुक्त झाला आहे. यापासून अनेक वस्तू तयार होऊ शकतात. आपण मोहावर क्लस्टरची आखणी करत आहोत. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. केशोरी परिसरात मिरचीचे भरपूर उत्पादन होते. त्यामुळे या परिसरात मिरचीचा क्लस्टर तयार होऊ शकतो. मशरूम व्यवसायाला येथे चांगला वाव आहे. मत्स्यपालन क्लस्टर तयार होऊ शकते. प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार झाले आहेत. मात्र, त्यांच्यात औत्सुक्य दिसत नाही. सर्वप्रथम क्लस्टर प्रमुखांची निवड करून प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय क्लस्टर तयार करा. बांबू, मका व दुग्ध व्यवसायाचे उत्तम क्लस्टर तयार होऊ शकतात. शेतकऱ्यांना श्रीमंतीचे शास्त्रच अवगत नाही. हा परिसर सुजलाम सुफलाम आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. समूह शेतीतून कारखाने उभारा व समृद्ध व्हा, असे मार्गदर्शन केले. यावेळी घोरपडे व पाटील यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
290721\45221815-img-20210729-wa0001.jpg
मंचावर उपस्थित आ चंद्रिकापुरे, गणेश घोरपडे व मान्यवर