गोंदिया : आपल्याला न्याय मिळावा व दोषी ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्यात यावी म्हणून मागच्या पाच दिवसांपासून गोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकरी कुटुंब आंदोलनाला बसले आहे. परंतु या आंदोलनाला पाच दिवस उलटूनही जिल्हा प्रशासनाने व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांच्या शेतातील घरावर अतिक्रमणाचा ठपका ठेवीत ग्रामपंचायत प्रशासनाने घर मागील वर्षी मार्च महिन्यात जमीनदोस्त केले. हा आपल्यावर झालेला अन्याय आहे. तेव्हा आपल्याला न्याय मिळावा, ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांनी आपल्या कुटुंबासमवेत सोमवारपासून (दि. ९) मौजा इर्री येथे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाला पाच दिवस उलटत चालले तरी अजूनही या शेतकरी आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. एवढेच नव्हे तर स्वतःला शेतकरी हितैषी समजणाऱ्या राजकीय नेत्यांनीसुद्धा या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे यांच्याविरोधात परिसरातील शेतकरीवर्गात रोष दिसून येत आहे.