परसवाडा : मागील १५ दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तीनतेरा करुन हरभरा, लाखोळी, गहू, जवस, भाजीपाल्यांचे नुकसान केले आहे. उन्हाळी धानाचे पऱ्हेही धोक्यात आले आहेत. शिवाय पाहणी न करता सर्वेक्षणाची यादी तयार केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना काय मदत मिळणार, याबाबत शंकाच आहे. यातूनच शेतकरी हवालदिल झाला आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने प्रधान सचिव मीना, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह लोकप्रतिनिधीनींही पाहणी करून नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. पण अधिकाऱ्यांच्या आदेशाला काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कचरापेटी दाखवित कार्यालय, पानटपरी व सरपंचांच्या घरी बसूनच यादी तयार करुन सर्वेक्षण झाल्याचे सांगितल्याचे दिसून येत आहे. गावातील किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले याची यादी जाहीर करण्यात आलीच नाही व यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. तिरोडा तालुक्यात सर्वाधिक लाखोळी पीक घेतले जाते. पण काही ठिकाणी त्यांचे सर्वेक्षण व पंचनामा केलाच नसून लाखोळीचे नुकसान लिहिण्यात येऊ नये, असे शासन व अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. सततच्या पावसाने उन्हाळी धानपिकांवर रोग लागत असल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्ज घेऊन पीक वाचवित आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांची पाठ थोपटत असताना दुसरीकडे जिल्हा बँकेकडून सक्तीची वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरातील वस्तुंची जप्ती करुन अधिकारी शेतकऱ्यांना धमकावित आहेत.दुसरीकडे संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या पैशावर विदेशवारी करुन आले आहेत. याची चौकशी होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी त्वरित मदतीची मागणी केली आहे. (वार्ताहर)
अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल
By admin | Updated: March 23, 2015 01:41 IST