साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील रुंगाटोला येथील अंकालू चैतराम परतेती (४७) ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचा चेहरा जाळून खून करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह रूंगाटोला नजीक रविवारी गावकऱ्यांना दिसला.प्राप्त माहितीनुसार, परतेती हे रुंगाटोला येथे पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी टाकीवर मासीक रोजीवर काम करीत होते. घटनेच्या दिवशी ते पाणी टाकीवर कामासाठी गेले होते. दररोज संध्याकाळी कामावर जाऊन रात्रीच्या वेळी तिथेच थांबायचे व सकाळी घरी परत यायचे. ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला काही बिहारी व्यक्ती मासे पकडण्याकरिता राहतात. ३१ डिसेंबरला सायंकाळी घरुन गेल्यावर रात्रीच्या वेळी अंकालू परतेती यांनी त्या बिहारी लोकांसोबत जेवण केले. मात्र त्यानंतर रात्रीच ते बेपत्ता झाले. इकडे सकाळी अंकालू घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. मात्र त्यांचा पता लागला नाही. त्यामुळे अंकालूच्या भावाने सालेकसा पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केली असता बिहारी व्यक्तींनी अंकालू हा त्याच रात्री घरी मासे सोडून देतो म्हणून घरी गेला होता असे सांगितले. मात्र याबाबतीत काहीतरी गडबड असल्याची चर्चा गावात होती. अंकालूचा मृतदहे रूंगाटोला नजीक आढळला. त्यांचा चेहरा जाळला होता. त्यांना मारल्यांनतर त्यांची ओळख पटू नये यासाठी त्यांचा चेहरा जाळला असावा. या ठिकाणी राहणारा एक बिहारी तेथून पसार झाल्यामुळे सालेकसा पोलिसांनी त्याला बिहारमध्ये पकडल्याची माहिती आहे.(वार्ताहर)
चेहरा जाळून केला खून
By admin | Updated: January 11, 2015 22:54 IST