सुकडी-डाकराम रस्त्याची दुरवस्था
सुकडी-डाकराम : आदिवासी व नक्षलग्रस्त जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेझरी बालापूर ते सुकडी-डाकराम रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कचराकुंड्यांना सुटली दुर्गंधी, नागरिक त्रस्त
गोंदिया : शहरात ठिकठिकाणी असलेल्या कचराकुंड्यांना दुर्गंधी सुटल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहेत. यातील कचरा नियमितपणे काढला जातो, परंतु कचरा काढल्यानंतर या परिसरात दोन ते तीन तास प्रचंड दुर्गंधी पसरते. यावर उपाययोजनेची मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.
कोंडीला वाहनधारकच जबाबदार
गोंदिया : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कायम कोंडी असते. लांबचलांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने, शहरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग पार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यासाठी अनेकदा वाहनधारकच जबाबदार असल्याने बऱ्याच वेळा वाहतूककोंडी होते.
बेरोजगारीमुळे युवापिढीत नैराश्य
गोंदिया : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले हजारो तरुण, तरुणी नोकरीच्या शोधार्थ आहेत. कोरोनाने सर्व उद्योगधंदे थांबले असल्याने, नोकरी शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे. अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येत लोटली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था
गोंदिया : गाव तिथे स्मशानभूमी आहे. मात्र, अनेक गावांतील स्मशानभूमीला रस्त्यांची समस्या आहे. पावसाळ्यात येथील समस्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दुरवस्थेतील स्मशानभूमी जिल्हाप्रशासनाने दुरूस्त कराव्या, अशी मागणी होत आहे.
पाळीव प्राण्यांच्या संख्येत घट
गोंदिया : ग्रामीण भागातील दुग्धव्यवसाय आधुनिकीकरणामुळे मोडकळीस येत असल्याचे चित्र सर्वत्र आहे़. पूर्वी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या घरी गाई, म्हशी राहत होत्या. आता मात्र प्राण्यांवरील खर्चही परवडणारा नाही. त्यामुळे शेतीत यांत्रिकीकरण वाढले.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
तिरोडा : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. या उघड्या डीपींमधून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई होत नाही.
नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून
नवेगावबांध : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या, तेथील नाल्याही बुजवून टाकल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहते.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.
राइस मिल ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मिलमुळे वाहन चालकांच्या डोळ्यांत धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यांत कचरा जाऊन वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.