सालेकसा : नगरपंचायत सालेकसाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छ सुंदर निर्मल सालेकसा लिहिलेले फलक लावलेले आहेत. परंतु, दिव्याखालीच अंधार असतो असे संकेत या फलकाकडे पाहून दिले जात आहेत. ज्या ठिकाणी स्वच्छतेचे फलक लावले आहेत. त्या फलकाखालीच घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. सालेकसा नगरपंचायत बनल्यापासून पाच वर्षे लोटले तरी या शहरात नगरीय व्यवस्थेप्रमाणे सोयीसुविधा व स्वच्छता दिसून येत नाही.
दोन वर्ष प्रशासक आणि तीन वर्ष लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नगरपंचायत कमिटीच्या हाती सत्ता सूृत्र असूनसुद्धा शहराच्या सर्वांगीण विकासाकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. केवळ आपले हित साधण्यासाठीच येथील पदाधिकारी काम करीत आहेत का, असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असून, रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी नाल्या गटारेसुद्धा घाणीने आणि कचऱ्याने तुडुंब भरलेली दिसत आहेत. मात्र, नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे याकडे मुळीच लक्ष नाही.
...........
अधिकाऱ्यांचे उडावाउडवीचे उत्तर
नगरपंचायतच्या हद्दीतील कोणत्याही समस्येबद्दल येथील मुख्याधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून कधीही सरळ समाधानकारक उत्तर मिळत नाही. उडावाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेबाबत नगरपंचायतीला जाग केव्हा येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.