वीज चोरीला फटका : सहा तासांच्या भारनियमनाने सारेच त्रस्तगोंदिया : दुर्गोत्सवातील झगमगाटासाठी मोठ्या प्रमाणात गोदिया शहरात वीज चोरी होत असल्यामुळे वीज गळतीचे प्रमाण तब्बल २१ टक्के झाले आहे. त्यामुळे ऐन सण उत्सावातच वीज वितरण कंपनीला भारनियमन सुरु करावे लागले. तब्बल तीन-तीन तासाप्रमाणे दिवसभरात सहा तासाचे भारनियमन सुरू केल्याचे शहरवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरत आहे. महावितरण कंपनी वीज चोरट्यांवर आळा घालण्याऐवजी सरळ वीज ग्राहकांना त्याची शिक्षा देऊन आपले कर्तव्य पार पाडत नसल्यामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. गोंदिया विभागात ४२ फिडर आहेत. त्यातल्या त्यात गोंदिया शहरात आठ फिडर असून ते वेगवेगळ्या भागात विभागले गेले आहेत. गोंदिया टाऊन एक हा परिसर माताटोली व बाजार परिसर असल्याने येथील विज चोरी बरीच असल्यामुळे या ठिकाणी ६ तास १५ मिनिटाचे भारनियमन केले जाते. गोंदिया टाऊन दोन या परिसरात गोंदिया शहर मुख्य बाजार व माताटोलीचा काही परिसर असल्यामुळे या ठिकाणातूनही वीज चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणीही ६ तास १५ मिनिटाचे भारनियमन करण्यात येत आहे. गोंदिया टाऊन ३ मध्ये माताटोली मनोहर चौक परिसर येत असल्यामुळे या ठिकाणी वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी ७ तासांचे भारनियमन केले जात आहे. गोंदिया टाऊन चार हे फिडर शहरातील नागरिकांसाठी आहे. मात्र या ही ठिकाणी आकडा टाकुन किंवा मिटरमध्ये बिघाड करुन विद्युत चोरी केली जात असल्यामुळे विज गळती मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या फिडरवरुन ५ तास ३० मिनिटाचे भारनियमन करण्यात येते. गोंदिया टाऊन ५ हा परिसर रामनगर व रेलटोलीचा असल्यामुळे याठिकाणातुनही विज चोरी होत आहे. या ठिकाणी ५ तास ३० मिनिटाचे भारनियम केले जाते. मनोहर चौक फिडरमध्ये ही ५ तास ३० मिनिटाचे भारनियमण केले जाते. तर सिव्हिल लाईन फिडरवरुन ४ तास ४५ मिनिटाचे भारनियमन करण्यात येत आहे. या भारनियमनामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले असून नागरिक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात वीज गळतीचे प्रमाण २१ टक्के
By admin | Updated: September 30, 2014 23:37 IST