सडक-अर्जुनी : आधुनिक युगात देखील ग्रामीण भागात लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. इमारतीसाठी असो की सरपणासाठी, लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. लाकडांचा उपयोग वाढल्यामुळे जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते त्या प्रमाणात प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे जंगले नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात सरपणासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा उपयोग होत असतो. त्यामुळे झाडांची कत्तल दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. एक झाड जगविण्यासाठी अनेक वर्षे खर्ची घालावी लागतात; पण ते कापण्यासाठी थोडासाच वेळ लागतो. त्यामुळे झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. जंगले विरळ होत आहेत. वन विभागातर्फे वाळलेली लाकडे नेण्यास मज्जाव करण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ते जंगलात जाऊन प्रथम झाडे कापून ठेवतात व नंतर ती वाळ्ल्यावर घरी आणतात. यामुळे वन विभागाला काहीही करता येत नाही. सध्या लग्नाचा हंगाम असून अन्न शिजविण्यासाठी लाकडांचा उपयोग होत असतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत असतात. त्यामुळे एका लग्नासाठी एका मोठ्या झाडाची कत्तल करावी लागते. जर एका गावात सरासरी एका वर्षी २० लग्ने झाली तर २० मोठ्या झाडांना आपले प्राण गमवावे लागते. पण त्या प्रमाणात त्यांची लागवड होताना दिसत नाही. झाडांमुळेच पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून झपाट्याने जंगलांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. निसर्गाशी खेळणे एक दिवस मानवाला फार महाग पडणार आहे.त्याचे परिणाम देखील आता हळूहळू दिसू लागले आहे. जंगले नष्ट होत चालली असल्यामुळे याचा पर्जन्यमानावर देखील परिणाम होत आहे. पावसाचे प्रमाण देखील कमी होत चालले असून उष्णतामानात दरवर्षी वाढ होत आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वृक्षतोडीमुळे काही जातींची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. झाडे ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल भेट आहे. प्रत्येक झाड हे मानवाला नि:स्वार्थ भावनेने काहीना काही देत असतो. मानवाने आपल्या स्वार्थी भावनेतून त्याला संपविण्याचा कट रचलेला आहे. कुणी पैशासाठी झाड कापतो, कुणी फर्र्निचरसाठी तर कुणी सरपणासाठी; पण झाडे लावायला कुणीही पुढे येत नाही. सरकार लाखो रुपये खर्च करून सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडाची लागवड करते. मात्र त्यात पाहिजे तसे यश आल्याचे दिसून येत नाही. याकडे वनविभागातील वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कापण्यात आलेल्या अनेक झाडांना वनकर्मचारी चोरीला गेल्याचे सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक वृक्षकत्तल प्रकरणे दडपले जातात. (शहर प्रतिनिधी)
अवैध वृक्षतोडीमुळे जंगलांचा होतोय ऱ्हास
By admin | Updated: April 25, 2016 01:37 IST