शेतकऱ्यांचा सवाल : रोगपीडित धानावर फवारणीसाठी सवलतीचे कीटकनाशक नाहीगोंदिया : यावर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजाने हरखून गेलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने पुन्हा दगा दिला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे धानपिकावर कीडीचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी सवलतीच्या दरात कीटकनाशक उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र त्याबाबतची मागणी करूनही कीटकनाशकाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे कीडींनी संपूर्ण पिक नष्ट केल्यावर कीटकनाशक देणार का? असा प्रश्न तमाम शेतकऱ्यांना पडला आहे.यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेकांना दुबार पेरणी करण्याची पाळी आली. पावसाच्या अभावाने काही ठिकाणी आवत्या टाकण्यात आल्या. नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकटात आता पुन्हा निसर्गाने भर टाकली. सध्या भापपिकांवर खोडकिडा व लष्कळी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हवे तेवढे उत्पन्न मिळणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी गोंदिया व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यांत भातपिकांवर खोडकिडा (वायएसबी) व लष्करी अळी) यांचा प्रादुर्भाव आढळला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोंदिया तालुक्याच्या आसोली व परिसरात खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळला होता. मात्र कृषी विभागाच्या सल्ल्याने व औषधाने सध्या नियंत्रणात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार, ब्राह्मणी, रेंगेपार, खोबा व जवळील परिसरात खोडकिडा व लष्कळी अळींनी धानपिकांना ग्रासले आहे. मात्र ते आर्थिक नुकसान पातळीच्या आत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होणार, यात शंका नाही. याशिवाय इतरही क्षेत्रात धानपिकांना रोगांनी ग्रासले आहे. क्लोरोपायरीपास्ट ही औषध गादमाशी, खोडकिडा व पिकांशी संबंधित सर्वच रोगांवर प्रभावी असून आठ हजार लिटर प्रात्यक्षिकांमागे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या औषधाचे दर २६३ रूपये असून यातील १९२ रूपये कृषी विभाग देईल तर ७१ रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. मात्र ही औषधसुद्धा अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)
संपूर्ण पीक नष्ट झाल्यावर सवलतीचे औषध देणार का?
By admin | Updated: September 1, 2016 00:43 IST