ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत : पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आरमोरी : तालुक्यातील शिवणी बूज परिसरात ऊसाची शेती केली जाते. जवळपास जंगल असून या जंगलातील रानडुकरे उसाच्या शेतीमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वन विभागाने डुकरांचा बंदोबस्त करण्याबरोबरच या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी बूज परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरात शेकडो हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड केली जाते. धानाच्या शेतीच्या तुलनेत उसाची शेती अधिक उत्पन्न देत असल्याने धान उत्पादक शेतकरी आता उसाच्या शेतीकडे वळत चालला आहे. शिवणी बूज परिसरात जंगल आहे. जंगलातील रानडुकरे उसाच्या शेतीमध्ये शिरून ऊस पिकाचे नुकसान करीत आहेत. ऊस खाण्याबरोबरच अनेक उसाचे धांडे केवळ उपटून फेकत आहेत. त्यामुळे ऊस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवणी बूज परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
रानडुकरांमुळे ऊस शेती उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 02:19 IST