आमगाव : रिसामा येथील १८० एकर शेतकऱ्यांची स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीवर त्यांच्या नावांची नोंद नाही. सतत दहा वर्षांपासून नावाची नोंदणीसाठी शेतकरी लढत आहेत. शेती सर्व्हे करताना गावठानच्या नावावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली, असा आरोप माजी प्राचार्य व रिसामा येथील शेतकरी शामराव बहेकार यांनी केला आहे. उपसंचालक भूमी अभिलेख विभाग नागपूर यांना ५ जून २००६ रोजी स्मरण पत्र देण्यात आले. त्यात रिसामा येथील १८० एकर शेती सर्व्हे करताना गावठानात समाविष्ट करून वैयक्तिक कब्जाप्रमाणे गटनिहाय सर्व्हे न करण्यात आल्याबद्दल ३१ मार्च व १९ मे रोजी उपसंचालक नागपूरला लेखी पत्र देण्यात आले. स्मरणपत्र ५ जून २००६ ला शेतकरी शामराव बहेकार रा. रिसामा यांनी दिला. त्यात १८० एकर शेतीवर शेतकऱ्यांचे नाव व आराजी न दाखविता शेतीकडे दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा व नकाशा मिळत नाही. जमिनीचे एन.ए. करता येत नाही. जमीन विक्री करता येत नाही. पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी शेतकरी शामराव बहेकार यांनी करून ते निवेदन मुख्यमंत्री, महसुलमंत्री, संचालक जमा बंदी आयुक्त यांना दिले. मात्र दहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरात न्याय मिळाला नाही. सदर प्रकरणात ग्रामपंचायत रिसामा यांनी ठराव घेऊन ३० एप्रिल २००८ रोजी अधिकाऱ्याला दिले. मात्र नियम धाब्यावर ठेऊन कोणतीच कार्यवाही झाली नाही. उलट जेवढा पत्रव्यवहार झाला तो कागदी व्यवहार अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकला. आता याविरूध्द आंदोलन भूमापन कार्यालयासमोर करण्याचा इशारा संजय बहेकार, शामराव बहेकार यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
१० वर्षांपासूनची मागणी थंडबस्त्यात
By admin | Updated: July 23, 2015 01:49 IST