शेतकऱ्यांचा आरोप : रूपये मुरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी दिली प्रतिनियुक्तीकाचेवानी : राज्य शासनाने शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना कार्यांन्वित केल्या. मात्र ज्या योजना आल्या त्यात शेतकऱ्यांचे हित कमी व कृषी विभागाचे अधिकारी व सहायकांनी अधिक लाभ घेतला आहे. काचेवानी क्षेत्राकरिता प्रतिनियुक्तीवर आलेले कृषी सहायक नाना ईलमे यांचाही कारनामा असाच आहे.शासनाच्या पैशाची ऐसीतैसी कशी करता येईल व शेतकऱ्यांची फसवणूक कशी करता येईल, यासाठीच तिरोडा तालुक्यातील जलशिवार व इतर कामांसाठी गोरेगाव तालुका कृषी विभागांतर्गत मंडळ कृषी कार्यालय मुंडीपारच्या बोटे-सोनी क्षेत्रात कार्यरत कृषी सहायक नाना ईलमे यांना तिरोडा तालुका कृषी कार्यालयाच्या तिरोडा मंडळ कृषी विभागाच्या काचेवानी क्षेत्राकरिता व शेतकऱ्यांच्या मदतीकरिता प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. मात्र त्यांनी शेतकरी व शेतीची कोणतीही कामे केली नाही. त्यांची प्रतिनियुक्ती मार्च २०१५ मध्ये करण्यात आली होती. मात्र प्रतिनियुक्ती ठिकाणी कमी तर गोरेगाव व स्वगावी ते अधिक वेळ घालवतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी सहायक ईलमे हे शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी नव्हे तर जलशिवाची कामे करून पैसा मुरविण्यासाठी आले होते. त्यासाठीच अधिकाऱ्यांनी त्यांची प्रतिनियुक्ती केली होती. त्यांनी शेतकऱ्यांची सेवा कमी तर स्वत:चा व अधिकाऱ्यांचा विकास अधिक घडवून आणला, अशी त्यांची ख्याती आहे. काचेवानी क्षेत्रातील बरबसपुरा, बेरडीपार, जमुनिया, डब्बेटोला गावांतील शेतकरी याची प्रत्यक्ष साक्ष देतात. ते नाममात्र कृषी सहायक असून अप्रत्यक्ष स्वरूपात एक कंत्राटदार बनून आल्याची विश्वसनिय माहिती आहे.त्यांच्यामार्फत मागील सात ते आठ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांची कामे कमी व मलाईयुक्त तांत्रिक कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यातून अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त टक्केवारी मिळाली. यंत्राला व यंत्रावरून सर्वाधिक मिळालेला कमिशनचा लाखो रूपयांचा लाभ घशात घालण्यात आला, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासन, शेतकरी व कृषी विभागाची फसवणूक करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) एक कृषी सहायक दोन तालुक्यात कसा?ज्या कामासाठी कृषी सहायक ईलमे यांना तिरोडा कृषी विभागात प्रतिनियुक्ती देण्यात आली होती, त्या कामासाठी तिरोडा तालुका कृषी विभागात तांत्रिक विभागाची कामे करणारे व सांभाळणारे होते. तरी केवळ तांत्रिक कामे करण्यासाठी ईलमे यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. प्रतिनियुक्ती कालावधीत त्यांना प्रतिनियुक्ती स्थळी पूर्ण वेळ देणे गरजेचे होते. परंतु ईलमे यांनी गोरेगाव स्थळी सर्वाधिक वेळ काढली.प्रतिनियुक्तीच्या काळाबाबत संभ्रमतिरोडा येथे प्रतिनियुक्तीचा काळ संपल्याची माहिती ईलमे यांनी तिरोडा मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांना रीतसर देणे गरजेचे होते. मात्र तशी माहिती त्यांनी दिली नाही. याबाबत तिरोडा मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांच्याशी संपर्क साधला असता, त्याबाबत आपल्याला माहिती नाही. तसेच मूळ स्थळी जाण्यास या कार्यालयातून कसलेही पत्र देण्यात आले नाही, असे त्यांनी सांगितले. गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, ईलमे यांचा तिरोडा येथील प्रतिनियुक्तीचा काळ संपला असून ते गोरेगावला कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही तालुका कार्यालयातून मिळालेली माहिती विसंगत असून बेजबाबदारपणाची असल्याचे दिसून येत आहे.
प्रतिनियुक्तीवरील कृषी सहायकाचा कारनामा
By admin | Updated: June 27, 2015 02:28 IST