लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे मलेरिया, डेंग्यूसह इतर आजारांची साथ सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत असून, नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागानेसुध्दा साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.४) ९७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर रुग्णांमध्ये बालकांचा समावेश आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४,३७,२१८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,१९,४२५ नमुन्यांची आरटीपीसीआर. तर २,१७,७९३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,१९३ नमुने बाधित आढळले. यापैकी ४०,४८० बाधितांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत ११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यात ४९ टक्के लसीकरण पूर्ण कोरोनाविरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ४८०२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ४,७६,३९५ नागरिकांना पहिला डोस तर १,२८,४०७ नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. निर्बंध झाले शिथिल, पण काळजी घ्यामंगळवारपासून (दि.३) जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू केेलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरु होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी रस्त्यांवर फारशी गर्दी दिसून आली आहे.