गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे यावर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजनेंतर्गत जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे विविध तालुक्यांत १११ बोअरवेल्सचे बांधकाम केले जात आहे. यापैकी ५४ बोअरवेल्सचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित बांधकाम प्रगती पथावर असून या महिन्याच्या शेवटी कार्य पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी ५० नवीन बोअरवेल्सच्या कार्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकूण १६१ बोअरवेल्स जिल्ह्यात तयार होतील.
भूजल सर्वेक्षण व जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०१४ दरम्यान जिल्ह्यातील सात तालुक्यातीील १०९ गावांत एकूण १११ बोअरवेल्स तयार करण्याचा प्रस्ताव बनवून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कामांवर एकूण १११.२० लाख रूपये अपेक्षित खर्च दर्शविण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ६ जून रोजी ५० नवीन बोअरवेल्सच्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान केली होती. याशिवाय देवरी तालुक्यातील सहा गावांमध्ये विहिरींच्या खोलीकरण कामांनाही जिल्हाधिकाऱ्यांद्वारे प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांद्वारे पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत ज्या बोअरवेलच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, त्यात आमगाव तालुक्याच्या आमगाव, सुपलीपार, बोथली व सीतेपार, गोंदिया तालुक्याच्या बघोली, घिवारी (गोंडीटोला), तेढवा (ढिवरटोला), दतोरा, नवरगाव खुर्द, नंगपुरा, पिंडकेपार, देवूटोला, डोंगरगाव, कटंगी, लोहारा, परसवाडा, एकोडी, गंगाझरी, गर्रा खुर्द, लंबाटोला, अर्जुनी व नवीनटोला (मोगर्रा), देवरी तालुक्यातील ककोडी, सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनीत राजू पटले व देवा लंजे यांच्या घराजवळ एक-एक, गोरेगाव तालुक्यातील पलखेडा (नवाटोला), कटंगी बु., गोरेगाव (चंद्रपूरटोली), तुमखेडा बु. (शाळाटोली), पिंडकेपार, मोहगाव बु., घोटी (गहलाटोला), तिरोडा तालुक्यातील बयवाडा, इसापूर, हलबीटोला, बोंडरानी, घाटकुरोडा, भुराटोला व चांदोरी खुर्द, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिरेगाव, येरंडी (देवल), सुकळी (खैरी), झरपडा, केशोरी, अर्जुनी/मोरगाव, ईळदा, ताडगाव, निमगाव व कोरंभी गावांत एक-एक बोअरवेलच्या बांधकामाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात सरासरी पाऊस १३४९.६१ मिमी पडतो. परंतु जून ते सप्टेंबर २०१३ च्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १९०५.४० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. सरासरीपेक्षा अधिक पाऊस आल्याने जिल्ह्यात यावर्षी मार्च महिन्यापर्यंत पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु यानंतर ग्रामपंचायतींद्वारे संबंधित गावांत पाण्याची टंचाई पाहून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने योजना तयार केली. विभागाद्वारे प्रशासकीय मंजुरी प्राप्त कार्यांना लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाई सहन करणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी समाधान मिळेल. (प्रतिनिधी)