गोंदिया : गावात नवीन बुद्ध विहार मंजूर झालेले आहे आणि आम्ही ते बनवून देतो म्हणून गावातील काही कंत्राटदारांनी अस्तित्वात असलेले जुने बुद्ध विहार पाडले. परंतु २ वर्षे उलटूनही नवीन बुद्ध विहाराचे बांधकाम अर्धवटच पडून आहे. त्यामुळे बुद्ध विहाराचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करून देण्याची मागणी तालुक्यातील मोरवाही येथील समता बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभा शाखा मोरवाही यांच्या संयुक्तवतीने स्थानिक विश्रामगृहात बुधवारी (दि.११) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
सन २०१८ मध्ये तत्कालीन समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या विकासनिधीतून बुद्ध विहारासाठी जवळपास ६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यासाठी नवीन बुद्ध विहार बांधावयाचे आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते राजू ब्राम्हणकर यांनी दिली. त्यानंतर नवीन बुद्धविहाराच्या बांधकामासाठी जुने बुद्ध विहार तोडण्यात आले. यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली नाही. तर दोन वर्षांचा कालावधी लोटूनही बुद्धविहाराच्या बांधकामाला सुरुवात केली नाही. येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी इतरत्र दुसरी कुठेही जागा उपलब्ध नसल्यामुळे व या रखडलेल्या बुद्ध विहारात धार्मिक विधी होत नसल्याने त्यांना आपले धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मोठी अडचण होत असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. याची कुठलीच चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. बांधकामास विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी विजय मेश्राम, अजय भालाधरे, रजनीकांत वैद्य, आशिष मेश्राम, अनिल रामटेके, कीर्तीकुमार मेश्राम, साहिल मेश्राम, शुभम नागरीकर, किरण मेश्राम, अर्चना मेश्राम, प्रमिला मेश्राम, वसुंधरा वैद्य, संगीता रामटेके यांनी केली आहे.