काचेवानी : तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली असून रोग व किडींच्या प्रादुर्भावाने ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तिरोडा तालुक्यात एकूण ३२ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र धान्य लागवडीखाली आहे. तूर, भाजीपाला व केळी वगळता ३० हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. सन २०१४-१५ च्या रबी हंगामात तृणधान्य गहू ४०७.८० हेक्टर क्षेत्रात, कडधान्य हरभरा ९५७.८० हेक्टरमध्ये, लाखोळी तीन हजार ६१० हेक्टरमध्ये, पोपट १९१ हेक्टरमध्ये, जवस एक हजार ८२१ हेक्टरमध्ये, मोहरी व इतर ७.८० हेक्टरमध्ये तर भाजीपाला २४०.४० हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. तालुक्यात रबी हंगामात ७२३५.८० हेक्टर क्षेत्रात विविध पिके घेतले जात आहेत. मात्र सतत १५ ते २० दिवसांच्या अंतराने होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे शेतकऱ्यांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे.सध्यस्थितीत तिरोडा तालुक्यात तुरीच्या शेंगा लागल्या असून त्या दाना भरण्याच्या मार्गावर असतानाच ढगाळ वातावरणाने त्यांच्यावर किडीचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.सध्या रबी हंगामातील कडधान्य व तृणधान्य रोपट्या अवस्थेत आहे. त्यामुळे कीड किंवा रोगाची समस्या उद्भवली तरी त्यावर नियंत्रण मिळविले जावू शकते. परंतु अशीच समस्या राहील तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. हरभऱ्यावरील घाटेअळी, गव्हावरील तांबेरा रोग अतिशय विनाशकारी असल्याने शेतकऱ्यांनी पिकाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी कळविले आहे. (वार्ताहर)
वातावरणातील बदलाने पीक उद्ध्वस्त
By admin | Updated: January 11, 2015 22:54 IST