गोंदिया : शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकार गर्दी दिसून येते. स्थानिक जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरही मोठी गर्दी असते. मात्र या बसस्थानकाला अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांनी विळखा घातला आहे.बसस्थानकावरून नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आदी मार्गाच्या बसगाड्या धावत असतात. नागरिकांना स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठीदेखील एस.टी. बसचे आश्रय घ्यावे लागते. मात्र या बसस्थानकाभोवती काळी-पिवळी तसेच आॅटो चालकांनी विळखा घातल्याने जागेअभावी एसटी चालकांना आपले थांबे बदलावे लागत आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहे. जयस्तंभ चौक तसेच इतर एसटीच्या थांब्यावर अवैध वाहनांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. प्रवासी जेथे बसगाड्या थांबतात तेथे बसची वाट पाहात उभे राहतात. मात्र या अवैध वाहनांच्या विळख्याने एसटी बसच्या चालकांची गोची होते व ते देखील बस थांबे सोडून आपले वाहन दुसऱ्या ठिकाणी थांबवतात. थांब्यावर उभे असलेले प्रवासी धावत जावून गाडीत बसतात. या प्रकारामुळे दररोज छोटे मोठे अपघातही घडतात. हा सर्व प्रकार वाहतुक पोलीसांच्या डोळ्यासमोर होतो . त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांना एक प्रकारचे अभयच मिळत आहे. बसथांब्याच्या जागेवर काळी-पिवळी, आॅटोरिक्षा, सायकल रिक्षा तसेच फळांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अडवला जातो व तो अरूंद पडतो. यामुळे एसटी चालकदेखील वाहन कुठे उभे करावे म्हणून संभ्रमात असतात. जेथे मोकळी जागा मिळेल तिथे आपली बस उभी करतात. बस मिळावी म्हणून बसच्या मागे काही प्रवासी व विद्यार्थी धावतात दरम्यान अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वाहतूक पोलीस व एसटी विभागाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बसस्थानक अवैध वाहतुकीच्या विळख्यात
By admin | Updated: November 30, 2014 23:09 IST