न्यायदंडाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : न.मा.द. महाविद्यालयाचा उपक्रमगोंदिया : कायद्याद्वारे संरक्षण हा सर्व नागरिकांचा अधिकार आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असल्याने मानसिक रोगग्रस्त व्यक्तींच्या हिताचे रक्षण कायद्याद्वारे करण्यात येते. अशा व्यक्तींची काळजी व रक्षण करणे ही सामाजिक जबाबदारी आहे, असे मत मुख्य न्यायदंडाधिकारी प्र.ह.खरवडे यांनी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा वकील संघाच्या वतीने नमाद महाविद्यालय जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित साक्षरता शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरकारी वकील विणा बाजपेयी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस.हेडाऊ उपस्थित होते. न्या. खरवडे पुढे म्हणाले की, मानसिक, समस्याग्रस्त व्यक्ती मनोरुग्ण होऊ नये यासाठी समाजाची व कुटूंबाची सकारात्मक भूमिका असणे अत्यंत महत्वाचे आहे. आयोजित साक्षरता शिबिरात लोकअदालत योजना व फायदे, दिवाणी प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, नागरिकांचे मुलभूत कर्तव्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. सहायक सरकारी वकील सुजाता तिवारी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता दिपक थाटे, नमाद महाविद्यालयातील विधी विभागाचे प्रा. बैस, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे महेंद्र पटले, एस.यू.थोरात उपस्थित होते. प्रास्ताविक विधी विभागाचे प्रमुख प्रा. सुयोग इंगळे यांनी केले. संचालन प्रा. उमेश उदापुरे यांनी तर आभार प्रा. अश्विनी दलाल यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
रुग्णांची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी
By admin | Updated: October 16, 2015 02:42 IST