नगर पालिकेची उदासीनता : छोटे व्यावसायिक, वाहनांचा विळखानरेश रहिले - गोंदियाकालच एक कावळा गांधींच्या डोक्यावर बसला होता, माझ्याकडे पाहून तुच्छपणे हसला, तो म्हणाला गांधी काही महान नाही, मी त्याच्या डोक्यावर बसतो, मी काही लहान नाही’ या चार ओळी बऱ्याच गोष्टी सांगून जातात. गोंदिया शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांच्या बाबतीत ही स्थिती आणखीच विदारक आहे. नगरपरिषदेलाच नव्हे तर संपूर्ण शहरवासीयांसाठी ही लाजीरवाणी बाब असली तरी त्याचे कोणालाच काही सोयरसुतक नसल्याचे गोंदियातील पुतळ्यांच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे.महापुरूषांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी पुतळे चौका-चौकात उभारले जातात. मात्र त्या पुतळ्यांच्या संरक्षणासाठी शहरात नगरपरिषद किंवा गावात ग्राम पंचायत धजावतही नाही. गोंदिया शहरात महापुरूषांच्या पुतळ्यांची संख्या खूप जास्त नाही. मात्र या मोजक्या पुतळ्यांचीही देखभाल नगर परिषदेला करणे शक्य होत नाही. पुतळ्यांचे महात्म्य योग्यरितीने जपले जात नसल्यामुळे बेवास कुत्री पुतळ्याभोवती तिथे जाऊन अभिषेक करतात. चिमण्या, कावळे पुतळ्यांना मुलामा चढविण्याचे काम करताना दिसतात. शहराच्या मध्यभागी भर बाजारात असलेल्या पुतळ्याचे हाल तर आणखीच बेकार आहेत. जमनालाल बजाज पुतळ्यासमोर व्यापारी वर्गाकडून कचरा टाकला जातो. नंतर त्याच ठिकाणी तो पोटविला जातो. फुटपाथवर बसणारे ठेलेवाले सायंकाळी याच पुतळ्याजवळ कचरा टाकून निघून जातात. पुतळ्याभोवतीची जागा तर जणू चारचाकी वाहनांसाठी हक्काचे पार्किंग स्थळ झाले आहे. कोणीही यावे आणि गाडी लावून जावे अशी तेथील स्थिती आहे. नेहरू पुतळ्याची स्थिती काहीशी अशीच आहे. या पुतळ्यासमोर हातठेलेवाले आपल्या गाड्या लावून बसलेले असतात. या पुतळ्याच्या कठड्यात असलेला कचरा नगरपरिषदेने मागील अनेक दिवसांपासून काढलेला नाही.महात्मा गांधींच्या पुतळ्याचा चबुतरा तर सर्वांसाठी कोणतेही शुभेच्छा फलक लावण्याचे हक्काचे ठिकाण झाले आहे. वर्षातील काही दिवसच हा पुतळा मोकळा श्वास घेतो. अन्यथा नेहमी हा पुतळ्या विविध फलकांनी झाकोळलेला असतो. या पुतळ्याभोवतीही आता छोट्या व्यावसायिकांकडून ठाण मांडले जात आहे. विशेष म्हणजे स्वच्छतेचा जागर करणाऱ्या या महापुरूषाच्या पुतळ्याभोवती मात्र अनेक वेळा कचऱ्याचा ढिग साचलेला असतो तर कधी मोकाट जनावरांचे ठाण असते. त्यामुळे हा पुतळा आपल्याच दुर्दशेवर अश्रू ढाळण्यापलिकडे काहीही करू शकत नाही.महाराष्ट्र शासनाने सन २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. त्या मोहीमेंतर्गत गठित करण्यात आलेल्या समित्यांनी आपल्या गावातील पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तीन वर्षापूर्वी स्वीकारली होती. त्यामुळे ग्राम पंचायतने पुतळ्यांचे जतन केले किंवा नाही तरी त्या पुतळ्यांकडे दुर्लक्ष होत नव्हते. परंतु शहराच्या ठिकाणच्या पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी नगर परिषदेवर आहे. तरीही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करते.जिल्ह्यात ११२१ पुतळेमहापुरूषांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी जिल्ह्यात ११२१ पुतळे उभारण्यात आले. यात महात्मा गांधी यांचे ३६ पुतळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ४३०, गौतम बुध्द ३९८, छत्रपती शिवाजी महाराज १८, पंडीत जवाहरलाल नेहरू ८, इंदिरा गांधी ९, महात्मा ज्योतिबा फुले ४२, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ३१, सावित्रीबाई फुले १३, राणी दुर्गावती १४, संत रविदास २५, भारत माता २, बिरसामुंडा ३८, मनाहेरभाई पटेल २, जमनालाल बजाज १, रमाबाई आंबेडकर १, राजेंद्र प्रसाद २, सुभाषचंद्र बोस ३, झाशीची राणी १ व इतर महापुरूषांचे पुतळे आहेत.
गुदमरतोय पुतळ्यांचा श्वास
By admin | Updated: January 7, 2015 22:53 IST