गोंदिया : शुक्रवारच्या सायंकाळी अचानकच वादळी वाऱ्याने चांगलाच कहर केला. तर शनिवारच्या पहाटे जिल्ह्यात कुठे रिमझीम तर कुठे चांगलाच पाऊस बरसला. या पावसामुळे नुकसानीची काही शक्यता कमी असली तरीही वादळी वाऱ्यामुळे मात्र आंब्याचा बार झडून गेल्याचे दिसून आले. तर पावसाचे परिणामही काही दिवसांनी नक्कीच पुढे येणार असे शेतकरी बोलत आहेत. पहाटेचा पाऊस सालेकसा तालुक्यात चांगलाच असल्याचे कळले. शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी अचानकच आकाशात काळे ढग दाटून आले व त्यासोबतच सोसाट्याचा वारा वाहू लागला. यामुळे सायंकाळी पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रभर वाहत असलेल्या वाऱ्यासह शनिवारी (दि.१४) पहाटे पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागांत रिमझीम पाऊस बरसला असून काही भागांत चांगलाच पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती नव्हती. मात्र पिकांवर याचा प्रभाव जाणवणार असल्याचे शेतकऱ्यांकडून कळले. आता काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोपडले होते. त्यात प्रचंड नुकसानी झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याचे या वादळी वारा व पावसाने आणखीच टेंशन वाढविले आहे. या पावसामुळे पिकांचे होणार ते होणारच मात्र आंब्यापासून आशा लावून बसणाऱ्यांच्या त्या आशेवरही पाणी फेरल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात अवकाळी पुन्हा बरसला
By admin | Updated: March 15, 2015 01:34 IST