एसडीओ कार्यालयात समन्वय बैठक : विनोद अग्रवाल यांची मध्यस्थीगोंदिया : बिरसी विमानतळावर कार्यरत सुरक्षारक्षकांनी विमानतळ प्रशासनाविरोधात आपल्या मागण्यांना घेऊन १ फेबु्रवारीपासून साखळी उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी विमानतळ प्रशासन व जिल्हा प्रशासनासोबत सुरक्षारक्षकांची समन्वय बैठक आयोजित करुन त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्तीने त्यांच्या प्रश्न निकाली लागला. ६ फेबु्रवारी रोजी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, विमानपतन निदेशक सुभाष प्रजापती, दडवाल सिक्युरिटीज कंपनीचे संचालक कर्नल व्ही.के. यादव, विमानतळाचे सिक्युरिटी इंचार्ज एस.के. मलीक, बिरसीचे सरपंच रवी तावाडे, सामाजिक कार्यकर्ता अनुराग शुक्ला व सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यात येईल, दर महिन्याला पगारासोबत पेमेंट स्लीप दिले जाईल, कुठल्याही कारणास्तव वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम सिक्युरिटी एजेंसी व विमानतळ अधिकाऱ्यांना याची लेखी माहिती देणे व इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी आपले उपोषण मागे घेतले. विशेष म्हणजे ५ फेबु्रवारी रोजी विनोद अग्रवाल यांनी विमातळा समोर साखळी उपोषणावर बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मंडपाला भेट दिली. तद्नंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी राव व विमानतळ अधिकारी प्रजापती, सरपंच तावाडे यांना मंडपात आमंत्रित करुन सुरक्षा रक्षकांसोबत चर्चा घडवून आणली. यावेळी जि.प. सभापती छाया दसरे, दीपक कदम, जयंत शुक्ला, रावणवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक निंबाळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा व्हावी व यात सर्वच घटकांचा समावेश असावा याकरिता ६ फेबु्रवारी रोजी उपविभागीय अधिकारी राव यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेतूनच मागण्यांवर तोडगा निघाला. (शहर प्रतिनिधी)
विमानतळ सुरक्षारक्षकांनी घेतले उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 01:31 IST