गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याने ८६.९० टक्के गुण घेऊन नागपूर विभागात दुसरा क्रमांक पटकावला. गोंदियातील विवेक मंदिर स्कूलच्या आकाश नितीन कोतवाल आणि दीपिका दामोधर वाघमारे यांनी ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.गोंदियातील रवींद्रनाथ टागोर विद्यालयाच्या (बंगाली स्कूल) अभिषेक रहांगडाले याने ९६.६० टक्के गुण घेत द्वितीय तर आमगावच्या आदर्श विद्यालयाची पूनम तुरकर ही ९६.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरी आली आहे.जिल्ह्यात २२ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २२ हजार ८८२ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. त्यात १९ हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.०३ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.७२ टक्के आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २४३३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. ७८२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७८७९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १७५१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २९५ शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेले बसले होते. त्यात ११ हजार ३२३ विद्यार्थी आणि ११ हजार ५५९ विद्यार्थिनी होत्या. एकूण २२ हजार ८८२ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षेला बसले होते. त्यातून ९ हजार ५९३ विद्यार्थी आणि १० हजार २९१ विद्यार्थिनींना मिळून एकूम १९ हजार ८८४ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८४.७२ तर उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी ८५.३९ आहे. यावर्षी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी जास्त संख्येने उत्तीर्ण होऊन आपली परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे यावर्षी बारावीच्या निकालात गोंदिया जिल्हा नागपूर विभागात पहिला होता. आता दहावीत विभागात दुसरा असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आकाश व दीपिका ठरले जिल्ह्यात अव्वल
By admin | Updated: June 18, 2014 00:14 IST