गोंदिया : यंदा पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. असे असतानाही मात्र खरीपाचा हंगाम कसण्यासाठी शेतकरी कंबर कसून शेतात उतरले होते. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत १०१ टक्के रोवण्या उरकल्या आहेत. कृषी अधिक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सर्वसाधारण लागवड क्षेत्रा पेक्षा दोन हजार ७६७ हेक्टर जास्त क्षेत्रात रोवणी झाली आहे. रोवणीची ही स्थिती उत्तम असताना पिकांवर मात्र अळी, करपा व खोडकिड्याचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचेही कळले. गारपिटीने रब्बीचा हंगाम कसा-बसा निघाल्याने शेतकरी दु:खी होता. त्यामुळे खरिपाचा हंगाम सर करायचाच अशी गाठ बांधून शेतकरी तयारीला लागला होता. मात्र मृग कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले. उशिरा आलेल्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाचा हंगाम हाती घेतला. त्यातूनच नेहमीच्या तुलनेत उशिरा का होईना मात्र यंदा जिल्ह्यात १०१ टक्के रोवण्या झाल्याचे कृषी विभागाकडून कळले. जिल्ह्याचे १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर सर्वसाधारण लागवड क्षेत्र आहे. यंदा मात्र जिल्ह्यात त्यापेक्षा दोन हजार ७६७ हेक्टर जास्त म्हणजेच एक लाख ८७ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात रोवण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील रोवणीची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास यात, गोंदिया तालुक्यात ३८ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ३० हजार ०५५ हे., आमगाव २० हजार २३० हे., सालेकसा १६ हजार १०४ हे., देवरी २१ हजार ०१९ हे., अर्जुनी मोरगाव २२ हजार ६६५ हे. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात रोवण्या करण्यात आल्या आहेत. तर सध्या पाऊस येत असल्याने येत्या १५ दिवस पाऊस नाही आता तरी चालणार असून त्यानंतर मात्र पिकांवर परिणाम जाणवेल असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए.एस. भोंगाडे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
कृषी विभाग म्हणते जिल्ह्यात १०१ टक्के रोवणी
By admin | Updated: August 30, 2014 01:47 IST