गोंदिया : कोरोनाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर बसत असतानाच त्यामुळे व्यापार व उद्योगधंदेही वांद्यात आले आहेत. मागील वर्षी शासनाला पूर्णपणे लॉकडाऊन करावा लागल्याने वस्तूंचे उत्पादन व वितरणही ठप्प पडले होते. त्यानंतर सर्व काही सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची पाळी आली. यंदा उत्पादन बंद ठेवण्यात आले नव्हते. मात्र, काम करणारी माणसेच असल्याने उत्पादनावर परिणाम झालाच. याचा परिणाम सर्वच वस्तूंवर पडत असतानाच दररोजच्या जीवनात उपयोगी खाद्यतेलांना चांगलाच बसला. मागील वर्षभरापासून खाद्यतेलांचे भाव चांगलेच कडाडले असल्याने त्याचा परिणाम घरातील स्वयंपाकखोलीवर जाणवत आहे. जेवण म्हटले म्हणजे तेलाचा वापर आलाच व खाद्यतेल कडाडल्याने काय खावे-काय नाही, असा प्रश्न पडू लागला आहे. मात्र, आता खाद्यतेलांची देशात आयात होत असल्याने खाद्यतेलांचे भाव उतरले असून याचा सर्वसामान्यांसह गृहिणींना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सध्या नेपाळ येथून खाद्यतेलाची आयात होत असल्याचे काही व्यापारी सांगत आहेत. यामुळे वर्षभरानंतर खाद्यतेलांचे दर उतरले असून चमचमीत खाणाऱ्यांसाठी ही गुड न्यूजच ठरणार आहे.
-----------------------------
सूर्यफुुल- १७५- १८०
सोयाबीन - १५५- १६०
शेंगदाणा- १८०- १८५
पाम- १४०-१५०
सरसो- १९५- २००
-----------------------------------
गृहिणींसाठी ‘गुड न्यूज’
कोरोना संकटाने सर्वच काही अस्ताव्यस्त करून टाकले. जीवितहानी होत असतानाच देशाची अर्थव्यवस्थाही होरपळून गेली आहे. मागील वर्षभरापासून महागाईने डोळे वटारले असून खाद्यतेलांचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम प्रत्येकच घरावर पडला आहे. आता आयात वाढल्यामुळे तेलांचे भाव उतरत असल्याने गृहिणींसाठी नक्कीच ‘गुड न्यूज’ आहे.
-----------------------------------
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल
पूर्वी आमच्या वाडवडिलांच्या काळात फक्त मीठ बाहेरून घ्यावे लागत होते. कित्येक शेतकऱ्यांच्या घरातच खाद्यतेलही निघत होते. आता मात्र शेतीची पद्धतही बदलली असून आता काही मोजक्याच वस्तू घरात निघतात. तर, बहुतांश वस्तूंसाठी बाजाराची धाव घ्यावी लागत आहे.
- मंसाराम चिखलोंडे (शेतकरी)
-------------------------
पूर्वी घरातल्या शेतातच खाण्याच्या वस्तूंचे उत्पादन घेतले जात होते. घरासाठी तेलीय पिकांचे उत्पादन घेतले जात होते व ते घरीच खायच्या कामी येत होते. आता बदलत्या काळानुसार शेतीची पद्धत बदलली आहे. यामुळे धानासह अन्य एखादे पीक घेतले जात आहे.
- निहारीलाल दमाहे (शेतकरी)