बोंडगावदेवी : आजचा शेती व्यवसाय महागडा व कठीण व्यवसाय आहे. पारंपरिक शेती करण्याच्या पध्दतीला बगल देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या लहरीपणावर शेती अवलंबून आहे. यातच वेळी-अवेळी निसर्गाचा कोप बरसतो. खतांच्या वाढत्या किंमती, उत्पादीत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगाची कमतरता या बाबी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती होण्यास आड येत असल्याने शेतकऱ्यांनी पीक बदल करुन प्रक्रिया उद्योगाबरोबरच शेतीपुरक व्यवसायाची कास धरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्यावतीने घेण्यात आलेल्या कृषी विभागातील विविध योजनेबाबत शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी भिमाशंकर पाटील, प्रा.ढोके, नागभिडे, तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष रतीराम राणे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार उपस्थित होते. सुसंवाद कार्यक़्रमात तालुका सल्लागार समितीचे शेतकरी तसेच तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी यांच्याशी चर्चा करुन बोंडगावदेवी येथे बांबु समुह, गोठणगाव येथे मका, केशोरी येथे मिरची, इटखेडा येथे मत्स्यपालन समुह तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. आमदारांनी सुचविलेल्या समुहाला कार्यान्वीत करण्यासाठी कृषी विभाग व आत्मा विभाग कटिबध्द असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. निवड झालेल्या समुहातील शेतकऱ्यांच्या प्राथमिक सभा घेऊन माहिती संकलन करणे, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजीत करणे, पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन करुन निवडलेले समूह पूर्णत्वास नेण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.कार्यक्रमाचे संचालन तालुका कृषी अधिकारी रविंद्र लांजेवार यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी मानले.