मानव विकास खुंटला : विभागाच्या अधिकाऱ्यांकडे माहितीचा अभाव नरेश रहिले गोंदिया अतिमागास तालुक्यातील वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागील चार वर्षापासून या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दीष्टाप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्यार्थिंनींना या योजनेचा लाभ द्यायचा आहे. म्हणजेच जिल्ह्यात दरवर्षी ५ हजार ३२८ विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करायचे आहे. परंतु मागील दोन वर्षात ३ हजार ४६५ विद्यार्थिनी या सायकलींपासून वंचित असल्याने मानव विकास योजना राबविण्यात नियोजन अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. शाळेत जाण्यासाठी ८ ते १२ वी च्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात ३ हजार रूपये टाकण्याची योजना शासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत अंमलात आणली. ० ते ५ किमी अंतरावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील ६६६ विद्याार्थ्यांना दरवर्षी सायकलींचा लाभ देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आठ तालुके असल्याने ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देण्यात येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात हजारो मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी आस लावून बसल्या आहेत. परंतु मानव विकास कार्यक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे मागील दोन वर्षात या योन्जनेपासून ३ हजार ४६५ विद्यार्थीनी वंचीत राहील्या आहेत. सन २०१३-१४ पासून या योजनेला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे ५ हजार ३२८ मुलीांना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतुप सन २०१४-१५ या वर्षात फक्त ३ हजार १८९ मुलींना लाभ देण्यात आला . उर्वरीत २ हजार १३९ विद्यार्थीनींना लाभ देण्याचे शासनाचे नियम असतांनाही त्यांना नियोजन अधिकारी मानव विकास यांनी वंचीत ठेवले. सन २०१५-१६ या वर्षात ४ हजार २ मुलींना लाध देण्यात आला. परंतु त्याही वर्षात १ हजार ३२६ मुलींना या लाभापासून वंचीत ठेवण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षाचे सायकलींचे नियोजनच अद्याप करण्यात आले नाही. असा दिला जातो लाभ सायकलचा लाभ देण्यासाठी मुलींना तीन हजार रूपये त्यांच्या खात्यात पाठविले जातात. जिल्हा नियोजन अधिकारी हा निधी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देतात. शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवतात व ते विद्यार्थीनींच्या खात्यात सुरूवातीला २ हजार रूपये व मुलीने सायकल घेतल्यानंतर बील सादर केल्यास उर्वरीत एक हजार रूपये त्यांना दिले जाते. पैशाचा हिशेबच नाही या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नियोजन विभागाने माध्यमिक शिक्षण विभागाला किती पैसे दिले याचा हिशेबच मानव विकासच्या नियोजन अधिकारी मृ.अ. भूत यांच्याकडे नाही. त्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. परंतु किती पैसे दिले याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे आढळली. तुम्ही दिलेल्या पैश्याचा उपयोग त्या विद्यार्थीनींना मिळाला किंवा नाही याचे उपयोगिता प्रमाणपत्राची माहिती देणे दूरच आहे. १४१५० लाभार्थी प्रतिक्षेत मानव विकास योजनेंतर्गत सायकल करीत ३ हजार रूपये देण्याची योजना शासनाची असल्याने या योजनेसाठी सन २०१६-१७ या सत्राकरीता गोंदिया जिल्ह्यातील १४ हजार १५० विद्याथीनी प्रतिक्षेत आहेत. मागील दोन वर्षात ३४६५ मुलींना वंचीत ठेवण्यात आले. त्याची भरपाई म्हणून यंदाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थीनींना देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्याव वाढवून देण्यात यावी ही मागणी होत आहे. या १४ हजार १५० मुलींसाठी ४ कोटी २४ लाख ५० हजार रूपये लागणार आहेत. नियोजन अधिकारी म्हणतात मानव विकास कार्यक्रम सांभाळण्यासाठी नियोजन अधिकारी म्हणून मृ.अ. भूत यांची नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे किती विद्यार्थीनींना आतापर्यंत लाभ दिला याची माहिती नाही. ही योजना राबविणारी यंत्रणा जिल्हा परिषदेचा माध्यमिक विभाग आहे. त्यांच्याकडेच माहिती मिळेत, आमच्याकडून माहिती दिली जाणार नाही. आमच्या संगणकावरील फाईल आताच करप्ट झाल्या आहेत. आमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.
३४६५ विद्यार्थिनी सायकलपासून वंचित
By admin | Updated: July 27, 2016 02:06 IST