खुनात घट : खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनांत मात्र वाढगोंदिया : गोंदिया जिल्ह्याने अंहिसेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा गांधींच्या नावाने चालणारी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वीरित्या राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मात्र त्याच गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात २६ जणांची हत्या व्हावी, एवढेच नाही तर २९ जणांच्या हत्येचा प्रयत्न व्हावा ही गोष्ट खटकणारी ठरत आहे.नाही म्हणायला क्राईमच्या घटनांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत घट येत आहे. सन २०१४ च्या तुलनेत यंदा खुनाचे सहा गुन्हे कमी झाले आहे. सन २०१५ च्या ११ महिन्यात २६ खुनाचे प्रकरण घडले आहेत. मागच्या वर्षी ११ महिन्यात ३२ खून झाले होते. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्याच्या काळात घडलेल्या २६ खुनाच्या घटनांपैकी २३ घटनांमागील आरोपींचा शोध लागला असून तीन घटनांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. उलगडा होऊ न शकलेले तिन्ही खून महिलांचेच आहेत. त्या महिलांची ओळख पोलिसांना पटली नसल्याने किंवा त्यांच्या नातेवाईकांनीही शोध घेतला नसल्यामुळे हे गुन्हे उघडकीस येऊ शकले नाही. मागच्या वर्षी ११ महिन्यात ३२ खुनाचे गुन्हे घडले होते. त्यातील ३० गुन्हे उघडकीस आले होते. मागच्या वर्षी वर्षधरात एकूण ३३ खूनाचे गुन्हे दाखल झाले होते.मागच्या वर्षी खूनाचा प्रयत्न या कलमाखाली ११ महिन्यात २१ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील १९ गुन्हे उघडकीस आले होते. यावर्षी २९ गुन्हे घडले असून पुूर्ण प्रकरणे उघडकीस आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आठ गुन्हे अधिक झाले आहेत. यावर्षी सदोष मनुष्यवधाचा एकही गुन्हा दाखल नाही. मागच्या वर्षी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून एक गुन्हा उघडकीस आला नाही. जोरू, जर, जमीन यामुळे खुनाचे गुन्हे घडले आहेत. सर्वाधिक खुनाचे गुन्हे गोंदिया शहरात घडले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
वर्षभरात जिल्ह्यात २६ खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2015 02:08 IST