लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य विभाग व प्रशासनातर्फे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यानंतरही बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले नाही. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत प्रसूतीदरम्यान महिलांच्या गर्भातच बाळांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे.गोंदिया जिल्ह्यात माता व बालमृत्यूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. आरोग्य विभाग व प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेत माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागात जनजागृती केली जात आहे.महिलांना गर्भावस्थेत कोणती काळजी घ्यायची, कोणता पोषक आहार घ्यायचा याविषयी मार्गदर्शन व नियमित तपासणी केली जाते. मात्र यानंतरही माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षभरात पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या १८२ महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. सन २०१७ एप्रिल महिन्यात १०, मे १५, जून १५, जुलै २०, आॅगस्ट १९, सप्टेबर १७, आॅक्टोबर २०, नोव्हेबर १३, डिसेंबर १६, जानेवारी ११, फेब्रुवारी १२, मार्च महिन्यात १४ अशा एकूण १८२ बाळांचा जन्मापूर्वीच महिलांच्या गर्भातच मृत्यू झाला आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात औषधांची कमतरता, रक्ताची कमतरता, अशक्तपणा, संसर्ग, सिकलसेल आदी कारणे असू शकतात.महिलांनी गर्भावस्थेत योग्य काळजी घेण्याची गरज आहे मात्र बरेचदा ते याकडे दुर्लक्ष करतात. गर्भावस्थेदरम्यान नियमित तपासणी करीत नाही. या सर्व कारणांमुळे गर्भातच बाळाचा मृत्यू होतो.- डॉ.सायस केंद्रेप्रभारी वैद्यकीय अधीक्षक, बाई गंगाबाई महिला रुग्णालय.
जन्मापूर्वीच १८२ बाळांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 21:42 IST
आरोग्य विभाग व प्रशासनातर्फे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यानंतरही बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले नाही.
जन्मापूर्वीच १८२ बाळांचा मृत्यू
ठळक मुद्देबालमृत्यू रोखण्यात प्रशासन अपयशी : अभियान ठरले नाममात्र, उपाययोजनांची गरज