पणजी : सांस्कृतिक लोकशाही सिद्ध झाल्याशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ उरणार नाही. सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध देशातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे मनोगत ज्येष्ठ लेखक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. सबनीस यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गोव्यात ५० मतदार आहेत. त्यांना संपर्क करण्याच्यादृष्टीने सबनीस गोवा भेटीवर आले आहेत. येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात सबनीस यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. स्व. नरेंद्र दाभोलकर स्व. गोविंद पानसरे, स्व. कलबुर्गी, दादरी हत्याकांड अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना सबनीस म्हणाले, की सध्याची स्थिती चिंताजनक आहे. विचारवंतांच्या हत्या होत आहेत. हिंदू धर्मवादाचा उन्माद सर्वांवर थोपविण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी देशातील विचारवंत व साहित्यिकांनी दंड थोपटले व साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करत सरकारचा निषेध केला तर ती त्यांची चूक आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. मात्र, पुरस्कार परत केल्यानंतर विषय संपला असे होत नाही. सध्याच्या स्थितीवर उपाय काढण्यासाठी साहित्यिकांनी संवाद करायला हवा, रस्त्यावर उतरायला हवे. सबनीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवादासाठी योग्य नेते आहेत, असे मला वाटते. गोध्रा हत्याकांडामुळे कलंकित झालेले मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जगात फिरताना बुद्ध व गांधींचे तत्त्वज्ञान मान्य करतात हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. म्हणून मला वाटते की मोदी यांचे हिंदुत्व हे संघाच्या भागवतांच्या हिंदुत्वाची चौकट ओलांडून पुढे गेले आहे म्हणून त्यांच्याशी संवाद व्हायला हवा. मोदी कदाचित राजकीय तडजोड म्हणून बुद्ध व गांधींचा उल्लेख करत असतीलही; पण जगासमोर ते या महामानवांविषयी बोलतात हे महत्त्वाचे आहे. मी मोदींचा टीकाकारचआहे. (खास प्रतिनिधी)
लेखकांची भूमिका योग्य
By admin | Updated: October 18, 2015 02:42 IST