पणजी : राज्यातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिक, रेन्ट अ कार व्यावसायिक आणि टूर्स व ट्रॅव्हल्स असोसिएशन (टीटीएजी) यांची संयुक्त बैठक मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी पर्वरी येथे मंत्रालयात घेतली. त्या वेळी सर्वांची गाऱ्हाणी त्यांनी ऐकली. बैठकीस वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, जल संसाधनमंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार मायकल लोबो, नीलेश काब्राल, माविन गुदिन्हो व कायतू सिल्वा उपस्थित होते. राज्यात १ हजार २०० रेन्ट अ कार व्यावसायिक असून त्यांना कायदेशीररीत्या व्यवसाय करण्यासाठी परवाने दिले जावेत, अशी मागणी रेन्ट अ कार व्यावसायिकांनी केली. मात्र, पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांचा त्यास आक्षेप आहे. रेन्ट अ कार व्यवसाय हा पर्यटक टॅक्सी व्यवसायाला मारक आहे. या व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या कंपन्या या व्यवसायात शिरकाव करतील, असे पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांना वाटते. दाबोळी विमानतळ परिसरातील टॅक्सी व्यावसायिक तसेच कळंगुट-कांदोळी-बागाच्या पट्ट्यातील टॅक्सी व्यावसायिकांनीही आपले म्हणणे व्यक्त केले. दोन्ही घटकांनी स्वत:च्या अन्य मागण्याही मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. टीटीएजीचेही म्हणणे पार्सेकर यांनी जाणून घेतले. या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. यापूर्वी विधानसभा अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार, मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. तथापी, आपण हॉटेल उद्योगाशी आणि आपल्या सर्व मंत्री व आमदारांशी बोलून योग्य तो तोडगा काढीन, असे पार्सेकर यांनी टॅक्सी व्यावसायिकांना सांगितले. (खास प्रतिनिधी)
टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढू
By admin | Updated: August 27, 2015 02:17 IST