सत्तरी : सत्तरी तालुक्यात ४ एप्रिल रोजी हाहाकार माजवणार्या वादळी वार्यात लाखोंचे नुकसान झाले असून महिना लोटला तरी वादळग्रस्तांपैकी अनेकांना अजून दमडीची मदत मिळालेली नाही. त्यात लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून वादळग्रस्तांना दिलेली आश्वासनेही एव्हाना हवेत विरली आहेत. तर सरकारी अधिकारी आचारसंहितेचे निमित्त पुढे करून वादळग्रस्तांना टोलवत आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत तरी नुकसानभरपाई मिळेल की नाही याबाबत वादळग्रस्त शंका उपस्थित करत आहेत. सत्तरी व डिचोली तालुक्यांत गेल्या ४ एप्रिल रोजी वादळी वार्यासह आलेल्या पावसाने हाहाकार माजवून कोट्यवधींचे नुकसान केले. अनेक घरांवर झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. तसेच बागायती व इतर उत्पादनाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले. तसेच वीज, टेलीफान, जलपुरवठा इत्यादी सरकारी मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, वादळात नुकसान झालेल्या वादळग्रस्तांनी तलाठी व कृषी अधिकार्यांना आणून आपल्या नुकसानीचा पंचनामा करून घेतला. तसेच नुकसानभरपाई संदर्भातील शेकडो अर्जही भरून दिले; परंतु घरांची मोडतोड झालेल्या काही वादळग्रस्तांना उपजिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री आधार निधीतून तातडीची मदत करण्यात आली. मात्र, अजून शेकडो अर्ज तसेच पडून आहेत. विशेषत: कृषीसंदर्भातील नुकसानीचा एकही अर्ज निकालात काढलेला नाही, त्यामुळे नुकसानग्रस्त वादळग्रस्तांत अस्वस्थता पसरली आहे. याविषयी कृषी खात्याच्या विभागीय अधिकार्यांकडे विचारणा केली असता वादळग्रस्तांनी दाखल केलेल्या दाव्यांपैकी सुमारे अडिचशे दावे पुढील कारवाईसाठी वाळपई मामलेदारांकडे पाठवल्याचे गेला महिनाभर सांगण्यात येते. मात्र, अजून एकाही वादळग्रस्त शेतकर्याला दमडीची मदत मिळालेली नाही. वादळग्रस्तांचे नुकसानभरपाई संदर्भातील बरेच अर्ज विभागीय कृषी कार्यालयात गेला महिनाभर पडून आहेत. अर्ज भरून घेतेवेळी योग्य पडताळणी न केल्याने या अर्जात अनेक त्रुटी आहेत. त्यात बरेच अर्जदार जमीन मालकी हक्कदार नसल्याने नुकसानभरपाईस हे अर्ज पात्र ठरत नाही, त्यामुळे या अर्जाचे काय करावे, हा प्रश्न अधिकार्यासमोर आहे. हे अर्ज फेटाळल्यास वादळग्रस्त भडकण्याची शक्यता असल्याने ते अर्ज कार्यवाहीविना अडवून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिली. (खास प्रतिनिधी)
वादळग्रस्तांना आचारसंहिता बाधली
By admin | Updated: May 12, 2014 00:21 IST