पणजी : राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाड्यावर एचआयव्हीची लागण झालेले रुग्ण आहेत, अशी खळबळजनक माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. राज्यात एचआयव्हीग्रस्त अशा नव्या रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचे आढळून येत आहे. २००३ साली एचआयव्हीची लागण झालेले ११00 नवे रुग्ण सापडले होते. नंतरच्या कालावधीत नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले. गेल्या वर्षी सुमारे ५५0 नवे एचआयव्हीबाधित रुग्ण सापडले. राज्यात एचआयव्ही रुग्ण नाहीत, असा एकही गाव व एकही वाडा नाही, असे मंत्री पार्सेकर यांनी नमूद केले. एकमेकांच्या केवळ सहवासातून किंवा स्पर्शातून एचआयव्हीची लागण होते, असा चुकीचा समज काही लोकांमध्ये आहे. तो समज खरा असता, तर राज्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली असती. एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबाबत शासकीय यंत्रणा जागृती करत आहे. कॉलेजमधील तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे, असे पार्सेकर म्हणाले. सरकार एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, डायबिटिसग्रस्त व अन्य रुग्णांना आवश्यक ती मदत करत आहे. कॅन्सरवर उपचारासाठी आवश्यक सुविधा गोव्यात नाहीत. यापुढे कॅन्सरमध्ये सुपरस्पेशालिटी विकसित करायला हवी, असे ते म्हणाले. रिवणच्या ‘त्या’ शाळेतील मुलांबाबत गुप्तता पाळायला हवी होती, असे आमदार रोहन खंवटे म्हणाले. आमदार नीलेश काब्राल यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी राज्यातील एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, क्षयरोगग्रस्त रुग्णांबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. (खास प्रतिनिधी)
गावोगावी, वाड्यावाड्यांवर एचआयव्हीबाधित रुग्ण!
By admin | Updated: August 12, 2014 01:33 IST