मंत्रिपदाची अजून हमी नाही : श्रीपाद
येत्या सोमवारी २६ रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी होणार्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी खासदार श्रीपाद नाईक यांना मंत्रिपद दिले जाईल, अशी हमी अजूनही कुणीच दिलेली नाही. मी दिल्लीत असून मोदी यांची अद्याप मंत्रिपदासाठी व्यक्तीश: चर्चा झालेली नाही, असे खासदार नाईक यांनी बुधवारी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे- प्रश्न : तुम्ही व्यक्तीश: पंतप्रधान मोदी यांना भेटून मंत्रिपदाबाबत चर्चा केली का? उत्तर : नाही. अजून माझी एकट्याची अशी स्वतंत्र भेट मोदींशी झालेली नाही. सर्वांसोबतच मी मोदी यांना भेटलो. मात्र, त्या वेळी मंत्रिपदाविषयी चर्चा झालेली नाही. मोदी यांना सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. प्रश्न : तुमचा पहिल्या टप्प्यातच म्हणजे येत्या २६ रोजी मंत्री म्हणून शपथविधी होईल का? उत्तर : तशी ग्वाही अजून मला कुणी दिलेली नाही. मला तशी सूचना आलेली नाही. मी अजून दिल्लीत आहे. सोमवारी जर शपथविधी असेल, तर तशी सूचना येईल. अजून वेळ आहे. पहिल्या टप्प्यात माझा शपथविधी होईल, असे मला वाटते; पण माझा तसा आग्रह नाही. प्रश्न : तुमचा विशिष्ट खात्यांसाठी आग्रह असेल का? उत्तर : माझा आग्रह नसेल; पण गोव्यातील प्रश्न सोडविण्यासाठी किंवा गोव्याला अधिक न्याय देण्यासाठी माझ्या आवडीची खाती मला मिळाली, तर आणखी बरे होईल. खाण, वन व पर्यावरण किंवा पर्यटन अशी खाती हाताळणे मला अधिक आवडेल. पर्यटन खाते मिळाले, तर गोव्याच्या पर्यटन व्यवसायासाठी मला बरेच काही करता येईल. खाण किंवा वन व पर्यावरण खाते मिळाले, तर गोव्यातील खनिज प्रश्न सोडविण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. प्रश्न : तुम्हाला या वेळी चौथ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळाला. याचे श्रेय कुणाला जाते व एवढी मते तुम्ही अपेक्षित धरली होती काय? उत्तर : विजयाचे श्रेय कुणा एकाला देता येणार नाही. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. भाजपचे सगळे कार्यकर्ते, आमदार, मंत्री, मुख्यमंत्रीही माझ्यासाठी वावरले. गेल्या दोन वर्षांत पर्रीकर सरकारने जे काम केले, त्याचाही मला लाभ झाला. शिवाय खासदार म्हणून मी जी कामे केली त्याचाही निवडून येण्यासाठी फायदा झाला. मोदी लाटेचा खूप चांगला परिणाम गोव्यातही झाला. त्यामुळेही माझी मतांची आघाडी वाढली. विजयास अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. शेवटी सर्वांत मोठे श्रेय जनतेला जाते. मला लाखभर मतांची आघाडी मिळेल, हे मी अगोदरच सांगितले होते. मला त्याची कल्पना आली होती. प्रश्न : या वेळची लोकसभा निवडणूक ही तुमची शेवटची होती काय, की यापुढेही खासदारकीची निवडणूक लढविण्यास तुम्हाला आवडेल? उत्तर : नव्या तरुणांना आता वाव मिळायला हवा, असे मला वाटते. एखाद्या तरुणास संधी देण्यास मी कधीही एका पायावर तयार असेन. मी माझी ही शेवटची निवडणूक आहे, असे म्हणणार नाही; कारण शेवटी आमच्या बाबतचा निर्णय हा पक्ष घेत असतो. भाजप जे काही सांगेल ते आम्ही ऐकत असतो. पक्षाने जर तुम्ही आणखी खासदारकीची निवडणूक लढवू नका, दुसर्या कुणाला संधी द्या, असे सांगितले, तर मी निश्चितच तत्काळ ते मान्य करीन. प्रश्न : मुख्यमंत्री पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी चर्चा अधूनमधून होत असते, त्याविषयी काय वाटते? उत्तर : आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याची इच्छा नाही व आपल्याला ते नको आहे, असे पर्रीकर यांनी मलाही सांगितले आहे. ते माझ्याशी याविषयी बोलले आहेत. त्यामुळे माझ्या मनात याबाबत पूर्ण स्पष्टता आहे. पर्रीकर यांना इच्छा नाही, हे स्पष्ट असून त्यांनी तसे जाहीरपणेही सांगितले आहे.