पणजी : दमदार पावसाबरोबरच रविवारी राज्याला जोरदार वाऱ्याचाही तडाखा बसला. वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शंभरावर झाडे कोसळली. परिणामी, अनेक ठिकाणी वीज गुल झाली. तसेच वाहुकीचीही कोंडी झाली. पावसामुळे पडझडही मोठ्या प्रमाणात झाली. घरांवरही झाडे पडल्याने आर्थिक हानी झाली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून पडल्या. परिणामी, अनेक भागांमध्ये खूप वेळ वीज गुल होती. बार्देस तालुक्यात पिर्ण येथे ४८ तास उलटले तरी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने संतप्त रहिवासी अखेर रस्त्यावर उतरले. दिवसभरात अग्निशामक दलास पडझडीचे ५0 हून अधिक कॉल आले. डिचोली, सत्तरी भागात अधिक पडझड झाली. राजधानी शहर परिसरातही झाडे उन्मळून पडली. करंझाळे येथे कामत रॉयल कॉलनीमध्ये कुंपणावर माड कोसळला. डिचोली येथे वाठादेव मंदिराजवळ कृष्णा शाबी पेडणेकर व बंधूंच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने ५१ हजार रुपयांची हानी झाली. साळ येथे घरावर झाड कोसळल्याने हानी झाली. वाळपई येथे काजूचे झाड शेडवर तसेच वाहनावर कोसळल्याने ५0 हजार रुपयांची हानी झाली. दक्षिणेत कोलवा पोलीस स्थानकाजवळ वीज खांब उन्मळून पडला. मडगावमध्ये पॉवर हाउसजवळ जुनाट वृक्ष उन्मळून पडला. (प्रतिनिधी) (आणखी वृत्त हॅलो १, २ वर)
वाऱ्याचाही तडाखा
By admin | Updated: June 22, 2015 02:21 IST